Strait of Hormuz Ship Attack Pune Engineer Death : हेरंब करमरकरचा आपल्या कुटुंबाशी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे २:४९ वाजता शेवटचा संपर्क झाला होता; त्यावेळी त्यांनी आपण सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे कळवले होते.

प्रक्षेपकाच्या हल्ल्यात इंजिन रुमला आग
मालवाहू जहाज ‘एमव्ही जीएफएस गॅलेक्सी’ भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ओमानच्या जलसीमांजवळून जात असताना एका प्रक्षेपकाचा त्याला फटका बसला. या आघातामुळे जहाजाच्या इंजिन रुममध्ये आग लागली आणि जहाज गतिहीन झाले. त्यानंतर, कर्मचाऱ्यांनी जहाज नांगरुन उभे केले आणि ‘लाइफबोट्स’च्या साहाय्याने सुरक्षित बाहेर पडले.
हल्ल्यानंतर हेरंब झालेले बेपत्ता
दुर्घटनाग्रस्त जहाजावर ११ भारतीयांसह एकूण २४ जणांचे कर्मचारी-पथक होते. ‘रॉयल नेव्ही ऑफ ओमान’ने सुरक्षित स्थलांतर केल्यानंतर सुमारे दोन तासांनी त्यापैकी २३ जणांची सुटका करण्यात आली. हल्ला झाला तेव्हा हेरंब हे इंजिन रुमजवळ असावेत असा अंदाज आहे. ते एकमेव व्यक्ती होते ज्यांचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. मरीन इंजिनिअर असलेले हेरंब करमरकर मूळ पुण्याचे होते.
दुर्घटनेच्या काही मिनिटं आधीच कुटुंबाशी संपर्क
हेरंब यांचा आपल्या कुटुंबाशी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे २:४९ वाजता शेवटचा संपर्क झाला होता; त्यावेळी त्यांनी आपण सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे कळवले होते. त्यांची ही सागरी मोहीम तीन महिन्यांहून अधिक काळापासून सुरु होती आणि त्यानंतर ते लवकरच भारतात परतणार होते.
Crime News : केतन अग्रवाल केसची पुनरावृत्ती, जिजूच्या प्रेमात उर्मिलाने नीरजचा जीव घेतला, जंगलात बोलावून भयंकर प्रकार
या हल्ल्यांमुळे होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरुन अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे अधोरेखित झाले असून, त्याच्या झळा भारताला बसत आहेत. भारताने इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांना बोलावून या हल्ल्यांबाबत तीव्र निषेध नोंदवला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) ‘अल बाहिया’ आणि ‘मोम्बासा’ ही व्यापारी जहाजे होर्मुझच्या दक्षिणेकडील मार्गिकेवरून जात असताना इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले. दोन्ही जहाजांवर मिळून ३० भारतीय खलाशी होते.
परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध
‘भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोहम्मद जवाद होसेनी यांना बोलावून या घटनेचा निषेध केला. पश्चिम आशियात शांतता व स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचार त्वरित थांबवून संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहनही भारताने पुन्हा केले’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षामध्ये पश्चिम आशियात आत्तापर्यंत १४ भारतीयांचा मृत्यू झाला आहे.
Khadse vs Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांसारखा राजकारणात कधी खंड पडला नव्हता, खडसेंची प्रतिक्रिया
‘होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडत असताना ‘अल बाहिया’ आणि ‘मोम्बासा’ या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारत अत्यंत चिंतित आहे. या दोन्ही जहाजांवरील एकूण ४६ कर्मचाऱ्यांपैकी ३० जण भारतीय खलाशी होते. यातील ‘अल बाहिया’वरील १२ भारतीय नागरिकांपैकी एकाचा मृत्यू झाला, अन्य एक जण जखमी झाला आहे. ‘मोम्बासा’वरील १८ भारतीय नागरिकांपैकी नऊ जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे’, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
‘खलाशांना लक्ष्य करणाऱ्या आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधून होणाऱ्या मुक्त व सुरक्षित जलवाहतुकीत अडथळा आणणाऱ्या या हल्ल्यांचा आणि हिंसक कृत्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो’, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय खलाशांना सर्वतोपरी मदत
भारतीय खलाशाच्या मृत्यूबद्दलही परराष्ट्र मंत्रालयाने शोक व्यक्त केला असून, जखमी खलाशी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशा सदिच्छा व्यक्त केली. ‘‘यूएई’मधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, प्रभावित भारतीय खलाशांना शक्य ती सर्व मदत मिळावी यासाठी आखाती देशातील संबंधित प्राधिकरणांच्या संपर्कात आहेत’, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
Jayant Patil : भाजपश्रेष्ठींचा विरोध मावळावा, जयंत पाटलांचे फडणवीसांना साकडे? ‘वर्षा’वर तासभराच्या बैठकीने चर्चांना उधाण
दरम्यान, ‘अल बाहिया’ आणि ‘मोम्बासा’ या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतील दक्षिण नौवहन मार्गावरून जात असताना ओमानच्या प्रादेशिक जलक्षेत्रात दोन इराणी क्रूझ क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य करण्यात आल्याचे ‘यूएई’च्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर नमूद केले आहे. दोनच दिवसांपूर्वी सायप्रसचा ध्वज असलेल्या ‘जीएफएस गॅलेक्सी’ या मालवाहू जहाजावर इराणने हल्ला केला होता. यात एक भारतीय कर्मचारी बेपत्ता झाला होता. अमेरिका आणि इराण यांच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात येण्याची आशा धुसर होताना दिसत आहेत.

