Mumbai Rain Vande Bharat Viral Video : मुंबईतील मुसळधार पावसात वंदे भारत एक्स्प्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रुळांवरील पाण्याचा फवारा थेट पुलावरील वाहनांवर उडाल्याचा दावा करण्यात येत असून, या व्हिडिओवर मीम्ससह सुरक्षिततेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एका व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यातून भरधाव वेगाने धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आणि तिच्या धडकेने उडालेला पाण्याचा प्रचंड फवारा असं सगळं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण गंमत म्हणजे हा फवारा रुळांवर नाही, तर थेट वरच्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांवर जाऊन आदळलेला दिसतो आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, त्यावर भन्नाट मीम्स आणि तितक्याच गंभीर प्रतिक्रियाही उमटत आहेत.
व्हि़डिओमध्ये नेमकं काय दिसतंय?
व्हिडिओमध्ये वंदे भारत वेगात रुळांवरून जाताना दिसते. रुळांवर साचलेल्या पाण्याला धडक लागताच पाण्याचा मोठा लोट हवेत उडतो आणि पुलावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर जाऊन पडतो. हा क्षण पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. काहींनी “वंदे भारतने मोफत कार वॉश केल्या”, “रेल्वे की रेन शॉवर सर्व्हिस” अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी ही घटना हसण्यावारी नेण्यासारखी नसल्याचं सांगत रेल्वे मार्गांवर साचणारं पाणी आणि त्याचा सुरक्षिततेवर होणारा परिणाम याकडेही लक्ष वेधलं.
व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया
विशेष म्हणजे, हा व्हिडिओ ज्या वेगाने व्हायरल झाला, त्याच वेगाने त्यावर मीम्सही तयार झाले. काही तासांत हजारो लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला. अनेकांनी हा पावसाळ्यातील सर्वात भन्नाट व्हिडिओ असल्याचं म्हटलं, तर काहींनी यामागे पावसाच्या व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित केला.
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठल्या ठिकाणचा आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र एका व्हिडिओतील टेक्स्टनुसाही हा व्हिडिओ कांजुर मार्ग स्थानकाजवळचा असल्याचे दिसत आहे. मुसळधार पाऊस, रुळांवर साचलेलं पाणी आणि भरधाव वंदे भारत यांचा हा संगम सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ पावसाळ्यातील पायाभूत सुविधांबाबत अनेक गंभीर प्रश्नही निर्माण करत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा