Headlines

Maharashtra Companies Closed: अनास्थेचे ‘कारखाने’ – maharashtra 36211 private companies shut down over the last 5 years


वाहतूककोंडी, रस्त्यांवरील खड्डे किंवा वीज-पाणी-कचरा यांसारख्या समस्यांमुळे हैराण झालेल्या वीस कंपन्यांचा पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहतीमधून स्थलांतराचा निर्णय, ही अर्थ-उद्योगादि क्षेत्रात पहिल्या क्रमांकावरील महाराष्ट्राच्या लौकिकाला बट्टा लावणारी घटना म्हणावी लागेल. अनेक देशी-विदेशी कंपन्या महाराष्ट्रात येताना प्रामुख्याने ज्या मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्णत्रिकोणालाच प्राधान्य देतात; त्या परिसरात पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणांच्या कारभाराचेही पितळ यातून उघडे पडले आहे.

वर्षभराहून अधिक काळ येथील समस्यांबाबत हे उद्योजक यंत्रणांकडे पाठपुरावा करीत होते; मात्र तेथील प्रशासन ढिम्म राहिले. अखेर या उद्योगांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या यंत्रणा खडबडून जाग्या झालेल्या दिसतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील असुविधांबाबत कबुली दिली, तर गेले काही दिवस हे वास्तव सातत्याने नाकारणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासनांबरोबरच ‘राजकारण करू नका,’ म्हणून अजूनही डोळे वटारणे सोडलेले दिसत नाही. एकंदरीत, या उद्योजकांनी राज्यातील उद्योगांना भेडसावणाऱ्या प्रश्नांनाच तोंड फोडले असून, आता तरी ते सोडवण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

दिवसाच्या कोणत्याही वेळेतील भीषण वाहतूक कोंडीमुळे पुणे-नाशिक आणि त्यातही चाकणमधून प्रवासाचे नाव काढले, तरी अनेकांना धडकी भरते. मुख्य रस्त्याबरोबरच चाकण-आंबेठाण आणि परिसरातील अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. पावसाळ्यात तेथून जाणेही मुश्किलीचे. त्यामुळे कामगारांना कामावर येण्यास काही तासांचा उशीर नित्याचा झाला असून, कारखान्यांच्या उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिका, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), औद्योगिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या परिसराचा श्वास अजूनही कोंडलेलाच आहे. याबाबत येथील उद्योगांच्या संघटना गेले १४ महिने पाठपुरावा करीत होत्या. मात्र, दैनंदिन कारभार चालवणेच अशक्य झाल्याने येथील वीस कंपन्या साताऱ्यातील खंडाळा औद्योगिक वसाहतीमध्ये स्थलांतर करीत आहेत.

पुण्याजवळचा चाकण-तळेगाव परिसर हा ‘ऑटोमाबाइल हब’ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. मर्सिडिज बेंझ, फोक्सवॅगन, महिंद्रा, स्कोडा अशा अनेक विख्यात कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित हजारो लघू उद्योग व लाखो कामगारांची वस्तीही त्या परिसरात आहे. एकंदर तीन हजार कंपन्या, १५ लाख कर्मचारी आणि ३२ हजार कोटी रुपयांची उलाढाल, असा हा पसारा आहे. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योगसंस्कृती बहरली. पुढे चाकण व परिसरातही अनेक कंपन्या सुरू झाल्या. मात्र, औद्योगिक विकासाच्या वेगापुढे पायाभूत सुविधा पुरवण्यात यंत्रणा कमी पडल्या.

पुण्याच्या सभोवताली रांजणगाव-शिक्रापूर, शिरवळ आणि हिंजवडी या औद्योगिक क्षेत्रांमध्येही याच समस्यांनी उद्योगजगत हैराण झाले आहे. त्यात भर कामगार पुरवण्यापासून ते भंगार उचलण्यापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रातील ठेकेदारीची, माफियांची व खंडणीखोरीची. काही वर्षांपूर्वी या भागातील जर्मन उद्योगांनी याच समस्यांमुळे गाशा गुंडाळण्याचा इशारा दिला होता. या परिसरात परदेशी प्रतिनिधींची नित्य ये-जा असते. वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांचे अनुभव त्यांच्यामार्फत जगभरात पोहोचत असतात, याचे तरी भान हवे. असे प्रश्न मांडले जातात, तेव्हा मंत्री आणि प्रशासन जागे होते; बैठका-पाहणी दौऱ्यांचे सोपस्कार होतात आणि पुढे काहीच होत नाही. एकीकडे मुख्यमंत्री-उद्योगमंत्री महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी जगभरात दौरे करून ‘उद्योगस्नेही महाराष्ट्र’ म्हणून प्रचार करतात.

अब्जावधी रुपयांच्या गुंतवणुकीचे करारही होतात. मात्र, नव्या उद्योगांना पायघड्या घालताना सुरू असलेल्या उद्योगांना अडगळीत टाकण्याचे प्रकार फार काळ चालणार नाहीत. एक लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहताना या उत्पादन क्षेत्राची चाके विनासमस्या सुरू राहावीत, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. या उद्योगांनी महाराष्ट्रातच इतरत्र स्थलांतर केले, ही त्यातल्या त्यात बरी बाब; पण यंत्रणांची अनास्था कायम राहिली, तर ते महाराष्ट्रातून बाहेर जाण्याचा दिवसही दूर नाही, एवढे लक्षात ठेवलेले बरे!

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत