Headlines

Krutika Tulaskar : ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेनंतर चेहऱ्याला पॅरालिसिस, मोठे प्रोजेक्ट सोडले; मराठी अभिनेत्रीनं सांगितला कठीण काळ


Krutika Tulaskar : ‘रात्रीस खेळ चाले ३’ फेम कृतिका तुळसकरनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.

krutika tulaskar on bells palsy
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री कृतिका तुळसकरला झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिनं शेवंताची भूमिका साकारलेली. या मालिकेनंतर अभिनेत्रीला एका कठीण प्रसंगाचा सामना करावा लागलेला. त्याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

कृतिकानं सांगितला कठीण प्रसंग

मुलाखतीदरम्यान कृतिका तुळसकर म्हणाली की, ”रात्रीस खेळ चाले’ मालिका संपली आणि त्यानंतर मी हिंदीत बरंच काम केलं. पुढे २०२३ मध्ये मी एका मालिकेचं शूटिंग करत होते. १८ जानेवारीचा दिवस होता. मी सकाळी उठले आणि मला वेळेत सेटवर पोहोचायचं होतं. तेव्हा मला चेहऱ्याच्या उजव्या बाजूला काहीच हालचाल जाणवत नव्हती. ब्रश केल्यावर आपण चूळ भरतो तेव्हा उजव्या बाजूने माझ्या तोंडातून पाणी बाहेर यायला लागलं. माझा उजवा डोळा सुद्धा व्यवस्थित काम करत नव्हता. माझ्या घरी काम करणाऱ्या ज्या मावशी येतात, त्यांना मी विचारलं की, माझ्या चेहऱ्यात काही वेगळं वाटतंय का? तेव्हा त्यांनाही डोळ्यात बदल जाणवला आणि त्या म्हणाल्या पटकन डॉक्टरकडे जा.’

Maharashtra TimesShubhavi Gupte : ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती! अवघ्या 20व्या वर्षी स्वबळावर घेतली कार, व्यक्त केल्या भावना
‘मी सोसायटीतल्या डॉक्टरकडे गेले. ते म्हणाले, उद्यापर्यंत बरी होशील, त्यांनी मला गोळ्या दिल्या. पण, मला वेगळंच काहीतरी वाटत होतं. त्यादिवशी मी माझ्या दोन मित्रांना भेटले. त्यांनाही हे सगळं वेगळं वाटलं. मग, त्यांच्या सल्ल्यानुसार मी न्यूरोलॉजिस्टकडे गेले. ते मला म्हणाले, याला ‘बेल्स पाल्सी’ (Bell’s palsy) म्हणतात, म्हणजेच चेहऱ्याचा पॅरालिसिस. मी म्हटलं ओके. आता मी बरी कशी होईन आणि कधी होईन? यावर डॉक्टर म्हणाले, ‘ते मी सांगू शकत नाही.’

‘तेव्हा माझ्याकडे दोन मोठे प्रोजेक्ट होते. डॉक्टरांचं सगळं ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझ्या हातात तेव्हा काम होतं आणि Bell’s palsy चं निदान झालेलं. मी लगेच निर्मात्यांना फोन केला आणि ते म्हणाले, ‘उद्या तुझं शूट आहे, तू सेटवरच ये’ मी सेटवर गेले. त्यावेळी माझा डोळा बंदच होत नव्हता. डोळ्यात धूळ जाऊन माझा डोळा संपूर्ण लाल झाला होता. डोळ्यातून सतत पाणी येत होतं. सेटवर गेल्यावर माझा मेकअप वगैरे झाला. पण, डोळ्याजवळ मेकअपच राहतच नव्हता, सतत डोळ्यातून पाणी येत होतं. माझ्या चेहऱ्याची एक बाजू हलतच नव्हती. मला एका क्षणाला असं जाणवलं की, आपल्याला आता हे जमणार नाही. कारण, मला चेहऱ्यावर एक्स्प्रेशन्सच आणता येत नव्हते.’

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

‘मला खाता येत नव्हतं, पाणी पिता येत नव्हतं. या परिस्थितीत मी काय करू हेच मला समजत नव्हतं. तेव्हा मग निर्मात्यांशी बोलून मी काम थांबवण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काही प्रोजेक्टचे माझे कॉन्ट्रॅक्ट साईन होते, तेही मला सोडावे लागले. मी कधी बरी होईन, मला काहीच माहिती नव्हतं. मग, मी रोज सकाळी उठायचे, रुटीन फॉलो करून डॉक्टरकडे जायचे. जवळपास तीन महिने झाले आणि यादरम्यान मी अनेक पुस्तकं वाचली, वेबसीरिज पाहिल्या. यातून मी हळूहळू सावरले. बरी झाल्यावर स्टेरॉइड्समुळे माझं वजन वाढलं होतं, केस गळत होते, स्किन खराब झाली होती, या सगळ्यातून नीट बरं व्हायला मला तीन वर्षे लागली.’ असं कृतिकानं शेवटी सांगितलं. ‘कलाकार’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कृतिका बोलत होती.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा