Headlines

Jasprit Bumrah ruled out of Sri Lanka Tests Team India big blow Auqib Nabi likely to get place; जसप्रीत बुमराह संघाबाहेर, श्रीलंका दौऱ्याआधी टीम इंडियाला झटका; बदली खेळाडू ठरला, वेगवान गोलंदाजाच्या निवडीची शक्यता


Team India Sri Lanka Test Tour : गेल्या आठवड्यात बेंगळुरु येथील भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जसप्रीत बुमराहची सखोल चाचणी झाल्यानंतर बुमराहबाबत कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय झाला.

Jasprit Bumrah Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोलंबो : अवघ्या काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराह भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी तंदुरुस्त झाला असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय समितीने त्याला श्रीलंका दौऱ्याच्या कालावधीत पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेदरम्यान बुमराहचा गुडघा दुखावला होता. त्यातून तो अद्याप पूर्ण बरा झाला नसल्याचे समितीने भारतीय संघव्यवस्थापनास कळवले आहे.

बुमराहबाबत धोका पत्करायचा नाही

इंग्लंडमधील वनडे मालिकेद्वारे बुमराहने भारतीय संघात पुनरागमन केले होते. मात्र त्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यांत तो खेळू शकला नव्हता. त्यावेळी दुसऱ्या सामन्यांत जायबंदी झाल्यामुळे बुमराहला विश्रांती दिली असल्याचे सांगण्यात आले होते. मालिकेतील दुसरा सामना १६ जुलैस झाला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजी केली नसल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंकेतील मालिका खेळण्यासाठी बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर इंजेक्शन घेतले होते. त्यामुळे त्याच्या गुडघ्यात सुधारणा झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये बुमराहची सखोल चाचणी झाली. त्यानंतर बुमराहबाबत कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय झाला.

गिलचा विचार करायला लावणारा प्रश्न

वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेनंतर बुमराहच्या दुखावलेल्या गुडघ्यावर उपचार झाले होते. त्यानंतर तो आयपीएलमील १३ सामने खेळला होता. त्यानंतर तो थेट इंग्लंडमधील मालिकेत खेळला होता. इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर शुभमन गिलने भारतीय संघास आघाडीच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा प्रश्न चांगलाच भेडसावत असल्याचे सांगितले होते. ‘तीन सामन्यांच्या मालिकेदरम्यान खेळाडू जायबंदी होऊन उपलब्ध होणार नसतील तर वर्ल्ड कप स्पर्धेच्यावेळीस काय होईल,’ अशी विचारणा गिलने केली होती.

भारतीय संघ श्रीलंकेत पूर्ण ताकदीने जाणार नाही हे स्पष्ट आहे. हर्षित राणा आणि नितिश कुमार रेड्डी हे यापूर्वीच संघाबाहेर गेले आहेत. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसणार हेही निश्चित आहे. त्यापाठोपाठ आता बुमराह संघात नसेल. अजून तरी भारतीय क्रिकेट बोर्डाने बुमराहच्या अनुपलब्धतेची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी पर्यायी खेळाडूची निवडही केलेली नाही.

अकिब नबीला संधी मिळणार?

बुमराहच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज अकिब नबीला भारतीय कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. परवेझ रसूल आणि उमरान मलिकनंतर तो तिसरा जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू ठरणार आहे. नबीच्या नावाला मुंजरी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या दोन रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मिळून नबीने १०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.

भारताचा श्रीलंका दौरा

जगज्जेतेपद कसोटी क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखण्यासाठी भारतीय संघास श्रीलंकेतील दोन कसोटींची मालिका महत्त्वाची आहे. मात्र या दोन कसोटीपूर्वींचा चार दिवसीय सराव सामना आता तीन दिवसांचा करण्यात आला आहे. मूळ कार्यक्रमानुसार भारतीय संघ ७ ते १० ऑगस्ट दरम्यान सराव सामना खेळणार होता. श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करताना भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याचा पुनरुच्चार केला होता. मात्र त्याचा कालावधी आता ७ ते ९ ऑगस्ट असेल. भारतीय क्रिकेट बोर्ड तसेच भारतीय संघव्यवस्थापनास याबाबत कळवण्यात आले आहे. पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ ४ ऑगस्टला कोलंबोस रवाना होईल. तीन दिवसांच्या सराव सामन्यानंतर संघ गॉल येथे रवाना होईल. याच ठिकाणी मालिकेतील पहिली कसोटी आहे. मालिकेतील दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवर होणार आहे.