Headlines

Indian Student Dies in US: PhDचं स्वप्न अधुरं! भारतीय तरुणाचा अमेरिकेत शेवट; लोकेशन पाठवून एकाएकी गायब, छंद जीवावर बेतला


अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय तरुणाचा गूढ शेवट झाला आहे. कुटुंबासोबत संवाद साधल्यावर त्यानं स्वत:चं लोकेशन कुटुंबियांसोबत शेअर केलं होतं. यानंतर तो एकाएकी बेपत्ता झाला. काही तासांनी त्याचं पार्थिव सापडलं.

student dies us
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन: सोलो ट्रिपला गेलेला तरुण अमेरिकेत एकाएकी बेपत्ता झाला. रस्त्यात असताना त्यानं त्याचं लोकेशन पाठवलं. यानंतर त्याचा ठावठिकाणा सापडला नाही. कित्येक तास त्याचा शोध सुरू होता. तरुणाच्या मृत्यूची बातमी येताच त्याच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला जबर धक्का बसला. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात असलेल्या सिएरा नेवादा परिसरातील बिग पाईन लेक्स जवळ तरुणाचं शव सापडलं. विक्रम मुबई असं मृत तरुणाचं नाव असून तो पीएचडीचं शिक्षण घेत होता. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यानं अमेरिका गाठली. पण त्याच्या स्वप्नाचा अर्धवट शेवट झाला.

विक्रम मुबई केमिकल इंजीनिअरिंगमध्ये डॉक्टरेट करत होता. १ ऑगस्टच्या रात्री साडे वाजता त्यानं कुटुंबाशी संपर्क साधला. त्यानं कुटुंबाला त्याचं लोकेशन शेअर केलं होतं. यानंतर त्याच्या सोबतचा संपर्क तुटला. विक्रम माघारी न परतल्यानं कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर शोधकार्य सुरू झालं. अनेक तासांनी अधिकाऱ्यांना बिग पाईन लेक्स परिसरात विक्रमचं शव सापडलं. विक्रम पाण्यात कसा पोहोचला, याचं कारण तपास यंत्रणा शोधत आहेत. पोलिसांना अद्याप तरी घातापाताचे पुरावे सापडलेले नाहीत. मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू आहे.

विक्रम सापडण्याआधी त्याच्या कुटुंबियांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडइटवर मदतीचं आवाहन केलं होतं. १ आणि २ ऑगस्टला त्या परिसरात गेलेल्या यूझर्सनी माहिती शेअर करावी, असं आवाहन करण्यात आलं होतं. ‘विक्रम एक अनुभवी हायकर होता. तो ज्या मार्गावर होता, तो अवघड नव्हता. त्याची कार ट्रेलहेडवर उभी आहे. त्यानं आतापर्यंत माघारी यायला हवं होतं,’ असं विक्रमच्या भावानं रेडइट पोस्टमध्ये नमूद केलं होतं. यानंतर त्यांनी त्याच पोस्टमध्ये अपडेट दिली. माझा भाऊ आता या जगात नसल्याची दुर्दैवी माहिती मदत आणि बचाव पथकानं दिली असल्याचं त्यानं सांगितलं.

विक्रमचा जन्म आणि त्याचं बालपण हाँगकाँगमध्ये झालं होतं. यूसी सांता बारबरामध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेण्यापूर्वी त्यानं २०२२ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बानामधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्सची पदवी घेतली होती. त्याला खेळाची आणि फिरण्याची विशेष आवड होती. हाच छंद जोपासत असताना त्याचा दुर्दैवी शेवट झाला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा