Headlines

Akola Crime | पोलिसांच्या मारहाणीत संशयिताचा मृत्यू? PSI सह तिघा पोलिसांवर खुनाचे गुन्हे, अखेर ठाणेदाराची बदली! | police beating death, finally transfer of the police psi


अकोला (अक्षय गवळी) : पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तपण कोल्हे यांची बदली झाली असून त्यांना कंट्रोल रुमला हलविण्यात आले आहे. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केल्याने या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन झाले होते. आरोप असलेल्या अकोट शहरातील एका पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अकोट पोलिसांत खुनाचे गुन्हे दाखल असून पुढील तपास सीआयडी करत आहे.

दरम्यान सीआयडीकडून या प्रकरणात स्थानिक पोलीस आणि अकोट शहर पोलीस निरीक्षक तपण कोल्हे यांची चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान अडथळा निर्माण होऊ नये, या अनुषंगाने ही बदलीची कारवाई झाल्याची माहिती आयपीएस अनमोल मित्तल यांनी दिली. तर यात आणखी आरोपी आहे का? याचा तपास सीआयडीकडून केला जातोय, अशी माहिती देखील सीआयडीचे प्रमुख आयपीएस अनिवाश बारगळ यांनी दिली.
Maharashtra Timesनाशिक हादरलं! गोळ्या झाडून उत्तर महाराष्ट्र केसरीची हत्या, अज्ञात हल्लेखोरांचं कृत्य, धक्कादायक कारण समोर
नेमकं घडलं काय होतं?
‘गोवर्धन हरमकार’ असं मृतक संशयित आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या छातीची हाडं तुटली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला एका ऑटो रिक्षा चालकाला बोलावत खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व प्रकरण १६ जानेवारी ते १८ जानेवारीच्या कालावधीत घडले. एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलीस कारवाई करण्यात उदासीनता दाखवत होते. परिणामी कुटुंबीयांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यलय गाठलं. अन् पोलिसांकर्वी चौकशी समिती बसवली. या प्रकरणात मृतकाचा वैद्यकीय अहवाल आणि कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे सर पोलीस कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके या दोघांनाही ताब्यात घेतले असून ते सध्या कारागृहात आहेत. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी दखल घेत त्यावेळी पोलिसांना गांभीर्यानं चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

कुटुंबीयांची नेमकी तक्रार काय?
मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील ‘PSI राजेश जवरे’ आणि इतर ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी पूतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यानंतर १६ जानेवारीला सुकळी गावात आणत घराची झडती घेतली. पुढे पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. १६ जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण सुरू झाली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने दोघांनी रुग्णालयात दाखल केलं. गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला बाहेरील ‘आकाश’ नामक व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि वैद्यकीय अहवालाद्वारे दिसून आले की, त्याच्या छातीची हाडं तूटली होती, असा आरोपही नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
Maharashtra TimesSitapur Family Murder: आईवर गोळी झाडली, पत्नीवर हातोडीने वार, पोरांना छतावरुन खाली फेकलं अन् भाऊ…
ठाण्यातील ‘ते’ पोलिस गेले तरी कुठे ?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट पोलिस स्टेशनमधील मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, पंचांग, सदाशिव हे कर्मचारी गुन्हे दाखल झाल्यापासून ठाण्यात हजर झाले नाहीत. हे कर्मचारी कुठे गेले? वरिष्ठांना याची कल्पना सुद्धा नाही का? तर पोलिस अधिक्षक बच्चनसिंह यांनीही ‘अकोट पोलिसांकडून मला याबाबत काहीही कळवण्यात आले नाही, नक्की चौकशी करतो’ अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान या प्रकरणाला महिना होऊन गेला तरी सीआयडीचा तपास अजूनही मंदावलेला का? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे सीआयडीच्या तपासावरही मृतकाच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणात लक्ष घालून सीआयडीला जाब विचारावा, अशी मागणी देखील कुटुंबीयांनी केली आहे.

अनेक पोलीस कर्मचारी चौकीत ठाण मांडून
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक पोलीस कर्मचारी 20 ते 25 वर्षांहून अधिक कालावधीत एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर काहींची सेवानिवृत्ती देखील येथेच होत असल्याचे समोर येत आहे. या प्रकारात वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत