![]()
मालिकेतील मुख्य कलाकाराच्या तब्येतीमुळे अनेकदा कथानकात बदल करावे लागतात. मात्र, हे बदल करतानाही प्रेक्षकांचे मनोरंजन कायम ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. ‘सन मराठी’वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेने हे अगदी सहज साध्य केले आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत आर्यनने मंजूच्या डोळ्यांत लाल तिखट टाकल्याने तिची दृष्टी गेल्याचे दाखवण्यात आले. या ट्रॅकमुळे काही दिवस मंजू मालिकेत दिसली नाही आणि अनेक प्रेक्षकांना तिने मालिका सोडल्याचा गैरसमज झाला. मात्र, आता मंजू पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रत्येक भागात दिसू लागल्याने प्रेक्षकांच्या मनाला दिलासा मिळाला आहे. याबाबत मंजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली, “प्रेक्षकांची लाडकी मंजू कुठेही गेलेली नाही. माझ्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे मला दहा दिवसांची सुट्टी घ्यावी लागली. जवळपास महिनाभर आधीच मी प्रोडक्शनला याबाबत कल्पना दिली होती. त्यामुळेच मालिकेत आर्यन मंजूच्या डोळ्यांत लाल तिखट टाकतो आणि तिची दृष्टी जाते, असा ट्रॅक लिहिण्यात आला. सुट्टीवर जाण्यापूर्वी डोळ्यांवर पट्टी बांधून माझं शूटिंग पूर्ण करण्यात आलं होतं. प्रोडक्शनने माझ्यासाठी स्वतंत्र कॅमेऱ्याचीही व्यवस्था केली होती.” “गेली तीन वर्षे ही मालिका सुरू आहे. या काळात मी इतका मोठा ब्रेक कधीच घेतला नव्हता. मात्र, मेडिकल इमर्जन्सीमुळे हा निर्णय घ्यावा लागला. अशा वेळी माणसं कळतात असं म्हणतात आणि ते मी स्वतः अनुभवलं. मुख्य भूमिका असल्यामुळे जवळपास प्रत्येक सीनमध्ये मंजू असते. माझ्याशिवाय शूटिंग कसं करायचं, याचं उत्तम नियोजन संपूर्ण टीमने केलं. विशेष म्हणजे, मी सुट्टीवर असताना कामासाठी कुणाचाही फोन आला नाही. त्याऐवजी सोशल मीडियावर मात्र प्रेक्षकांचे भरभरून मेसेज येत होते. मी मालिका सोडली, असा त्यांचा गैरसमज झाला होता. त्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं माझ्यावरील प्रेम अनुभवायला मिळालं.” यापुढे ती म्हणाली, “आता मी पुन्हा शूटिंगला परतले आहे. सेटवर प्रत्येकजण माझी विशेष काळजी घेतो. मला नियमित डोळ्यांत ड्रॉप्स टाकावे लागतात. त्याची आठवणही सेटवरील प्रत्येकजण करून देतो. मी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोन वापरला तरी लगेच ‘मंजू, फोन ठेव’ असं प्रेमानं सांगितलं जातं. या मालिकेमुळे मला खूप चांगली माणसंही मिळाली आहेत. या कठीण प्रसंगी प्रोडक्शन आणि चॅनेलने मला सांभाळून घेतलं त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. आता मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. मंजू दृष्टी गेल्याचं नाटक करत असल्याचं तिनं सत्याला सांगितलं आहे. त्यामुळे आर्यनचा डाव उधळून लावण्यासाठी ती सज्ज झाली आहे. यापुढील प्रत्येक भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, याची मला खात्री आहे.”
Source link
टीव्हीच्या दुनियेतून:'इन्स्पेक्टर मंजू'ने मालिका सोडली?; अखेर मोनिका राठीने सांगितले खरे कारण, डोळ्यांत लाल तिखट गेले अन्…
