Headlines

समाजातील वैचारिक अपंगत्व दूर करा:भारत विकास परिषदेच्या कार्यक्रमात भय्याजी जोशींचे प्रतिपादन




समाजातील वैचारिक अपंगत्व दूर करावे लागेल तर प्रत्येक नागरिक मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने योगदान देईल, ज्यामुळे आपला देश स्वावलंबी आणि शक्तिशाली होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी भारत विकास परिषदेच्या कार्यक्रमात व्यक्त केले. भारत विकास परिषदेच्या पुण्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या देणगीदार आणि हितचिंतक संमेलनात ते बोलत होते. यावेळी प्रांत संघचालक नाना जाधव, विश्वस्त दत्ता चितळे, केंद्र प्रमुख विनय खटावकर, प्रमुख देणगीदार महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या बागेश्री मंठाळकर, ढोले-पाटील शिक्षण संस्थेचे सागर ढोले पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना जोशी पुढे म्हणाले की, देणगीदार या शब्दाऐवजी सहभागी झालेले अशा भूमिकेत सर्व समाज सामील झाला आणि आर्थिक योगदान नि:स्वार्थपणे दिले तर ते जास्त अर्थपूर्ण ठरेल. सर्वागीण विकास साधण्याचे कार्य भारत विकास परिषद करीत आहे. आजपर्यंत भारत विकास परिषदेने ३० हजार कृत्रिम पाय मोफत बसवले असून, याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये घेतली गेली आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या विकलांग व्यक्तिंना कृत्रिम पाय बसवल्यानंतर, त्यांनी अनेक प्रकारच्या कवायती, हालचाली, धावणे, उडी मारणे, मांडी घालून बसणे, नृत्य करणे अशी प्रात्यक्षिके करून प्रेक्षकांना अचंबित केले. डॉ. विजय नाईक यांनी प्रात्यक्षिके करून घेतली. केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी मोफत विकलांग शिबिरांची माहिती दिली. दत्ता चितळे यांनी प्रास्ताविक केले, राजशेखर अभ्यंकर यांनी आभार मानले तर मंदार जोग यांनी सूत्रसंचालन केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत