Headlines

टीम इंडियाची लंकेविरुद्ध ‘कसोटी’


शुभमन गिल, केएल राहुल, जडेजावर भारताची मदार : बुमराहची अनुपस्थिती जाणवणार

वृत्तसंस्था

गॉल

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 15 ऑगस्टपासून श्रीलंका दौऱ्यात कसोटी मालिकेची सुरुवात करणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) 2025-27 चक्राचा भाग असलेली ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा हा 600 वा कसोटी सामना असणार आहे. हा सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सकाळी 10 वाजल्यापासून खेळला जाईल. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी असल्यामुळे तो या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय संघ 9 वर्षांनंतर श्रीलंका दौऱ्यावर आहे. यापूर्वी, भारताने 2017 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली लंकेविरुद्ध कसोटी खेळताना 3-0 असा दणदणीत विजय मिळवला होता. यंदा मात्र शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय भारतीय संघात केवळ तीन खेळाडूंनी श्रीलंकेत कसोटी सामने खेळले आहेत. 12 खेळाडू प्रथमच श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहेत. या यादीत कर्णधार शुभमन गिलचाही समावेश आहे. केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे केवळ तीन खेळाडू आहेत, ज्यांना श्रीलंकेत कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. भारताने गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, पण यावेळी संघाचा चेहरामोहरा लक्षणीयरीत्या बदलला आहे. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडू या कसोटी मालिकेत कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गिल, जडेजा, केएलवर मदार

सध्याच्या घडीला टीम इंडियात केएल राहुल अनुभवी फलंदाज आहे. याशिवाय, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा यांना देखील श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे. दुसरीकडे, कर्णधार शुभमन गिलकडूनही संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. श्रीलंकेत कर्णधार म्हणूनही त्याच्यावर संघाची मोठी मदार असेल. साई सुदर्शन जायबंदी झाल्याने मुंबईकर सरफाराज खानला संघात स्थान मिळाले आहे. मात्र, त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळणार का, हे अद्याप निश्चित नाही. याशिवाय, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात रवींद्र जडेजा हा एकमेव अनुभवी फिरकीपटू आहे. यासोबत कुलदीप यादवचा पर्याय आहे. पण, गेल्या काही महिन्यांत कुलदीपची कामगिरी सातत्यपूर्ण राहिलेली नाही. जडेजा, कुलदीपशिवाय मानव सुथार हा पर्याय गिलकडे उपलब्ध आहे. पण, त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळवते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराजवर असेल. मात्र, प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीची भारताला उणीव भासू शकते. मोहम्मद सिराजव्यतिरिक्त प्लेइंग-11 मध्ये प्रसिद्ध कृष्णा किंवा गुरनूर ब्रार यापैकी ज्याला संधी मिळेल, तो आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम असेल.

लंकन संघात युवा खेळाडूंचा भरणा

गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेची घरच्या मैदानावरील कामगिरी चांगली राहिली आहे. 2024 च्या सुरुवातीपासून त्यांनी मायदेशात सात कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. या कालावधीत त्यांना केवळ दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर एक सामना अनिर्णित राहिला. गेल्या काही वर्षांत दिनेश चंडिमल हा श्रीलंकेचा सर्वाधिक प्रभावी फलंदाज ठरला आहे. गोलंदाजीत जानेवारी 2024 पासून घरच्या मैदानावर प्रभात जयसूर्या हा श्रीलंकेचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 13 डावांत 30 च्या सरासरीने 41 बळी घेतले असून, यात एका डावात पाच बळी घेण्याच्या पाच कामगिरींचा समावेश आहे. याशिवाय, मायदेशात खेळताना पहिल्या कसोटीत धनजंय डी सिल्वाच्या नेतृत्वात लंकन संघ भारताविरुद्ध कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संभाव्य संघ

भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, सरांश जैन/मानव सुथार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.

श्रीलंकन संघ : धनंजय डी सिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, निशान मदुष्का, कामिंदू मेंडिस (उपकर्णधार), दिनेश चंडिमल, पसिंदू सूरियाबंदरा, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, केशर नुवांथा, मिलन रथनायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, दिलशान मदुश्का.

वातावरणाचा प्रभाव

गॉल हे समुद्रकिनारी वसलेले शहर असून, येथील स्टेडियम समुद्राच्या अगदी जवळ आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे खेळपट्टी लवकर कोरडी होते. सामन्याच्या अंतिम टप्प्यात रिव्हर्स स्विंग निर्णायक ठरू शकतो. गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे मैदानाचा टणकपणा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिव्हर्स स्विंगवरही परिणाम होऊ शकतो. येथील एकंदर परिस्थिती पाहता, कसोटीच्या उत्तरार्धात चेंडू कमी-जास्त उसळण्याचाही धोका आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी मालिका महत्त्वाची

सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ पाचव्या स्थानी आहे. ही मालिका जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याची नामी संधी आहे. अंतिम सामन्यासाठी भारताला उर्वरित नऊ सामन्यांपैकी किमान सात सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची मालिका भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

 

600 व्या कसोटी सामन्यात देशाचे नेतृत्व करणे ही अभिमानाची बाब आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 600 व्या कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

-शुभमन गिल, भारतीय कर्णधार

    पहिली कसोटी : 15-19 ऑगस्ट 2026

स्थळ: गॉल इंटरनॅशनल स्टेडियम, गॉल

वेळ : सकाळी 10.00 वा.पासून

थेट प्रक्षेपण : सोनी लिव्ह,

 

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत