Mumbai auto Taxi:मुंबई ही स्वप्नांची दुनिया मानली जाते. या मायानगरीत लाखोंच्या संख्येत लोक प्रवास करतात. या मुंबईच प्रमुख आकर्षण मानलं जात ती म्हणजे ऑटोरिक्षा. सध्यातरी २६ रुपये भाडं असणाऱ्या ऑटोरिक्षा आता भाड्यामध्ये वाढ करणार आहेत असा प्रस्ताव ऑटो , टॅक्सी संघटनांनी परिवहन विभागाकडे मांडला

भाडेवाढीच्या प्रस्तावात ऑटोरिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपयाची वाढ
परिवहन विभागातील सूत्रांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, भाडेवाढीच्या प्रस्तावात ऑटोरिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपयाची, तर टॅक्सीच्या भाड्यात शहरभर २ ते ३ रुपयांची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा प्रस्ताव परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाकडून मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे (MMRTA) पाठविला जाण्याची शक्यता आहे.
भाडे वाढ किती रुपयाने होणार
प्रस्ताव मंजूर झाल्यास ऑटोरिक्षाचे किमान भाडे सध्याच्या २६ रुपयांवरून २७ रुपये होऊ शकते. तसेच, टॅक्सीचे पहिल्या १.५ किमीचे किमान भाडे सध्याच्या ३१ रुपयांवरून किमान ३३ रुपये होण्याची शक्यता आहे.
रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची मागणी
इंधन, वाहनांची देखभाल, विम्याचे हप्ते आणि परवान्याशी संबंधित खर्च वाढल्यामुळे भाडेवाढ करावी, अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी केली आहे. मुंबई रिक्षामेन युनियनचे प्रमुख थम्पी कुरियन यांनी सांगितले की, वाढत्या खर्चामुळे चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. रिक्षा भाडे वाढीची मागणी ही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी केली आहे खर्च वाढल्याने ही मागणी करण्यात आली आहे.
टॅक्सींच्या किमान भाड्यात किमान ४ रुपयांची वाढ
दरम्यान,मुंबईटॅक्सीमेन युनियनचे प्रमुख फ्रेडरिक डी’सा यांनी सांगितले की, त्यांच्या संघटनेने काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या किमान भाड्यात किमान ४ रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाकडे पाठवण्याची मागणी केली आहे.
वाढत्या दैनंदिन खर्चाची भरपाई करण्यासाठी भाडेवाढ आवश्यक
ऑटो आणि टॅक्सी चालकांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत इंधन, वाहन देखभाल आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रवाशांची मागणी पुन्हा वाढली असली तरी चालकांच्या उत्पन्नावर वाढत्या खर्चाचा ताण आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आणि चालकांच्या वाढत्या दैनंदिन खर्चाची भरपाई करण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
प्रवासी संघटनांचा विरोध
मात्र, या प्रस्तावाला प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, आधीच महागाईमुळे कुटुंबांवर आर्थिक भार वाढलेला असताना आणखी भाडेवाढ केल्यास प्रवाशांच्या खर्चात वाढ होईल. मुंबईतील प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, महागाईच्या तुलनेत नागरिकांचे उत्पन्न वाढलेले नाही आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडेल.

