Headlines

तरल कवितेचा स्वर हरपला – Tarun Bharat


सावंतवाडी प्रतिनिधी : ‘मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही, झाडांची पोपटी पालवीच मला विश्वासार्ह वाटली,’ यांसारख्या आशयघन कविता लिहिणारे ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.

धामणस्कर यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयांत एम.ए. पदवी घेतली. त्यानंतर १९८८ पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेत त्यांनी सेवा बजावली. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘कविता-रती’, ‘दीपावली’, ‘हंस’, ‘मराठवाडा’ आदी नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या.

ग्रंथालीच्या ‘दशकाची कविता’ या काव्यसंकलनात निवडक दहा कवींमध्ये धामणस्कर यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला होता. ‘प्राक्तनाचे संदर्भ’ या त्यांच्या कवितासंग्रहाला राज्य सरकारचा केशवसुत पुरस्कार मिळाला. तसेच ‘बरेच काही उगवून आलेले’ या कवितासंग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिकाने गौरविण्यात आले. साहित्य अकादमीच्या ‘साठोत्तरी मराठी कविता’ या संकलनात त्यांच्या पाच कवितांचा समावेश होता. ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या ‘भारतीय कवितायें १९८३’ या संग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या पाच मराठी कवींमध्ये धामणस्कर यांचाही समावेश होता. दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात धामणस्कर यांची ‘वस्तू’ ही कविता अभ्यासासाठी समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक सरकारच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘कंदील विकणारी मुले’ ही त्यांची कविता समाविष्ट झाली होती. त्यांच्या काही कवितांचे हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.मानवी भावभावना, निसर्ग आणि माणूस यांच्यातील भावबंध टिपणारी तरल कविता त्यांनी आयुष्यभर लिहिली. नव्वदीनंतरही त्यांचे कविता लेखन सुरू होते. ‘शेवटपर्यंत त्यांचे मन संवेदनशील होते,’ अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी धामणस्कर यांना श्रद्धांजली वाहिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत