![]()
अगदी फाळणीवेळीच जन्माला आलेला दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मोठ्या दिलानं पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करतात. त्यासाठी ते चक्क बसनं शेजारच्या देशात जाऊन ‘लाहोर डिक्लरेशन’ला आकार देतात. परंतु, पाकचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या डोक्यात भलतीच योजना शिजत असते. त्यावेळी कडक्याच्या हिवाळ्यात दोन्ही देशांतील बर्फाच्छादित चौक्यांवरील सैनिकांना खालच्या तळांवर बोलावण्याची परंपरा होती. तिचाच फायदा घेऊन ते पाक सैनिकांना मुजाहिदीनांच्या वेशात अत्युच्च ठिकाणांवरील भारतीय चौक्या काबीज करण्यासाठी पाठवतात. भारतीय जवान जेव्हा पुन्हा आपल्या चौक्यांकडे परततात, तेव्हा मोठ्या प्रमाणात त्यांना प्राण गमवावे लागतात. कारण उंचावर बसलेले पाकिस्तानी सैनिक त्यांना अगदी सहजपणे लक्ष्य करतात. अशा वेळी भारतीय लष्कराचे सैनिक ही ठाणी पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. युद्धाच्या निर्णायक क्षणी हवाई दल जाबाज जवानांच्या मदतीसाठी रणभूमीत उतरतं आणि पाक व मुशर्रफ यांचे मनसुबे धुळीला मिळतात. यातही ‘गोल्डन अॅरोज स्क्वॉड्रन’ या तुकडीचं कारगिल युद्धातील योगदान महत्त्वपूर्ण ठरतं. ‘सफेद सागर’ याच अल्पपरिचित पैलूचं सखोल दर्शन घडवते.
ही सीरिज अर्थातच बर्फाच्या अंतहीन महासागरातील खडतर उत्तुंग हिमालयीन भूभागावर लढल्या गेलेल्या मोहिमेवर आधारित आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलातील एका विशेष तुकडीची कोणत्याही अडचणीतून मार्ग काढण्याची तयारी आणि त्यांचं धैर्य, त्याग व असीम शौर्याचं अभिमानास्पद दर्शन यातून घडतं. परंतु, हे करताना अखंड रक्तपात, अतिरंजित दृश्यं, भडक संवाद किंवा आक्रमक संगीताचा अजिबात आधार न घेता अतिशय संयत; पण प्रभावीपणे आपला आशय प्रेक्षकांपुढे ठेवण्यात ही सीरिज यशस्वी ठरते. यासाठी जुनी छायाचित्रं, भाषणांच्या क्लिपचा योग्य वापर करण्यात आला आहे.
हा एक युद्धपट असला, तरी सीरिज केवळ आक्रमणांपुरता मायर्यादित न ठेवता त्यामध्ये मोहिमेत एकापाठोपाठ येणाऱ्या अडचणी, सैनिकांच्या खासगी आयुष्यातील हळवे तथा त्रासदायक कोपरे, हलकेफुलके क्षण, त्यांच्या पत्नींचं भावविश्व आणि महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानमधील नाट्यमय राजकारण व त्यातील लष्कराचा घातकी हस्तक्षेप असे अनेक कंगोरे यातून रंजकपणे उलगडण्यात आले आहेत. काही ठिकाणी विषय उगाचच ओढल्यासारखं वाटतो, पण दिग्दर्शक वेळीच आपल्याला मूळ मुद्द्यावर घेऊन येतो. शत्रू देशाबाबत कुठंही अश्लाघ्य भाषा न वापरता त्यांचा कुटील चेहरा यात टराटरा फाडण्यात आला आहे, हे विशेष. या सर्व भट्टीमध्ये ‘बॉर्डर’ सिनेमासारखं एखादं ओठांवर रेंगाळेल असं गाणं असतं, तर आणखी रसास्वादन झालं असतं. कारण यातील तिन्ही गाणी तितकासा प्रभाव टाकत नाहीत.
अंजन श्रीवास्तव (अटलबिहारी वाजपेयी), विनय पाठक (नवाज शरीफ), मनू ऋषी छाडा (परवेझ मुशर्रफ) आणि एस. एम. झहीर (शरीफ यांचे वडील) हे ज्येष्ठ अभिनेते दीर्घ अनुभवाच्या जोरावर आपापल्या भूमिका जिवंत करतात. जिमी शेरगीलच्या (विंग कमांडर बी. एस. धनोआ ऊर्फ टोनी) सहजसुंदर अभिनयाचं यात पुन्हा दर्शन होतं. बऱ्याच वर्षांनी हिंदी कलाकृतीत परतलेल्या अभिनेता सिद्धार्थला (स्क्वाडून लीडर अजय आहुजा) तुलनेनं कमी स्क्रीनटाइम मिळूनही तो छाप सोडून जातो. अभय वर्मा (फ्लाइंग ऑफिसर आर. एस. धालीवाल ऊर्फ धाली), मिहीर अहुजा (फ्लाइंग ऑफिसर सी. एस. बालरेड्डी ऊर्फ बाल्डी), अर्णव भसीन (फ्लाइंग ऑफिसर अमित गुप्ता ऊर्फ गुफी), तारुक रैना (फ्लाइट लेफ्टनंट जितेंद्र सांगवान ऊर्फ सँगी) यांनी उत्साही पण आपल्या जबाबदारीप्रति गंभीर जवान लीलया साकारले आहेत. दिया मिर्झा (टोनीची पत्नी), अमृता बागची (अजयची पत्नी) आणि प्राजक्ता कोळी (बाल्डीची प्रेमिका) यांना फार वाव नसला, तरी त्यांनी आपल्या भूमिकांना यथोचित न्याय दिलाय.
कारगिल युद्धावर ‘एलओसी कारगिल’, ‘लक्ष्य’, ‘गुंजन सक्सेना’ किंवा ‘शेरशहा’ असे अनेक चित्रपट प्रेक्षकभेटीला येऊन गेलेत. पण ‘सफेद सागर’मध्ये हवाई दलाच्या कामगिरीच्या एका वेगळ्या अंगाचं दर्शन घडतं. अलीकडच्याच ‘धुरंधर ‘नं भारत-पाकमधील नातेसंबंधांचं वास्तव अत्यंत बेधडकपणे मांडल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली आहे. अशातच स्वातंत्र्यदिनाआधी दाखल झालेल्या या सीरिजमधून देशभक्तीला नव्यानं साद घालतानाच देशाच्या सशस्त्र दलांना जोशपूर्ण व तितकीच भावूक आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.
वेव सीरिज ऑपरेशन सफेद सागर
ओटीटी नेटफ्लिक्स
निर्माते : कुशल श्रीवास्तव, दिग्दर्शक : ओनी सिंग
अश्विनी मिश्रा लेखक अभिजित सिंग परमार, कुशल श्रीवास्तव, संदीप जैन, वरुण कश्यप, निखिल रवी
कलाकार: जिमी शेरगील , सिद्धार्थ , अभय वर्मा, मिहीर अहुजा, अर्णव भसीन, तारुक रैना, अंजन श्रीवास्तव, विनय पाठक
छायांकन : सत्यजित पांडे
संकलन : मिकी शर्मा
दर्जा: साडे तीन स्टार
