Headlines

कांदा साठवणुकीवर प्रश्नचिन्ह ; खरेदीतील अनियमिततेच्या चौकशीची व्हावी खासदारांची केली मागणी


Nashik News: खरेदीतील कथित अनियमितता कांद्याची साठवणूक आणि खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केली.

कांदा साठवणूक प्रश्न
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,नाशिक : जिल्ह्यात मूल्य स्थिरीकरण कोष अर्थात ‘ पीएसएफ ’ अंतर्गत झालेल्या कांदा खरेदीतील कथित अनियमितता, कांद्याची साठवणूक आणि खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत सखोल चौकशी करावी, अशी संयुक्त मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केली. यासंदर्भात दोन्ही खासदारांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कांदा खरेदी आणि साठवणुकीतील त्रुटींचा मुद्दा संयुक्तपणे मांडला.

पंचनाम्यात नमूद

चांदवड तालुक्यात नाफेडच्या खरीप कांदा खरेदी २०२६-२७ अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या कांद्याच्या साठवणुकीबाबत गंभीर बाबी समोर आल्याचे दोन्ही खासदारांनी सचिवांच्या निदर्शनास आणून दिले. ३ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या पंचनाम्यानुसार साठवण केंद्रावरील सुमारे ६० ते ७० टक्के कांदा सडलेल्या अवस्थेत आढळून आला. अंदाजे २,२०० ते २,४०० मेट्रिक टन कांदा शेडमध्ये साठवण्यात आल्याची नोंद आहे. पाहणीच्या वेळी संबंधित खरेदीकेंद्रावर कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसल्याचेही पंचनाम्यात नमूद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Maharashtra TimesTalasari Crime : मित्रासोबत घरी जाताना बाईक बिघडली, वाटेत सहा जणांनी बंगल्यात ओढून नेलं, 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पालघर हादरलं

‘संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी’

‘पीएसएफ’अंतर्गत नाशिक जिल्ह्यात झालेल्या कांदा खरेदीमध्ये सहभागी ‘एफपीओ’ व ‘एफपीसी’ आणि सहकारी संस्थांची माहिती, खरेदी केंद्रांची संख्या व ठिकाणे ‘सीडब्लूसी’ गोदामांमध्ये साठवलेल्या कांद्याचे प्रमाण, नाफेड आणि ‘एनसीसीएफ’कडून करण्यात आलेल्या तपासण्या तसेच त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील केंद्र सरकारकडून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही खासदार वाजे आणि खासदार भगरे यांनी संयुक्तपणे केली.

Maharashtra TimesNagpur News: जमिनीखाली नेमकं काय याचा शोध न घेताच केले रस्ते खोदकाम ;केबल्स ,जलवाहिन्यांचे झाले नुकसान

कारवाईची मागणी

कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावातील अस्थिरता आणि उत्पादन खर्चाच्या संकटाचा सामना करत असताना शासनाच्या योजनेअंतर्गत त्यांच्या कांद्याची खरेदी झाल्यानंतर तो योग्य पद्धतीने साठवला जात नसेल, तर शेतकऱ्यांच्या हिताला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात दोषी व्यक्ती अथवा संस्थांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी भूमिका दोन्ही खासदारांनी मांडली.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा