एका महान सत्पुरुषाकडून ऐन तारुण्यात त्यांना मंत्रदीक्षा मिळाली होती. त्यांचा सहवासही काही प्रमाणात लाभला होता. त्यांनी स्वहस्ते काही सद्ग्रंथ सदिच्छापूर्वक दिले होते.

‘मला आत्मज्ञान करून द्या,’ मोठ्या काकुळतीने त्या वयोवृद्ध व्यक्तीने गुरूंना विनवणी केली. गुरू आश्चर्य आणि अनुकंपेसहित त्यांच्याकडे पाहत राहिले. भावनेचा आवेग ओसरल्यानंतर ते सद्गृहस्थ पूर्वेतिहास सांगू लागले.
इतक्या महान व्यक्तीच्या सान्निध्यात आपण आलो, त्यांनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारले हीच पूर्ण कृपा आहे, आता काही अजून करायची आवश्यकता नाही हा अभिमान बळावला. तारुण्य सरले. संसार उत्तम झाला. कशाची काही कमतरता नव्हती; पण काही तरी महत्त्वाचे राहून गेले आहे, ही जाणीव आता अस्वस्थ करत होती. म्हणूनच ते त्यांच्या सद्गुरूंच्या परंपरेत असणाऱ्या या गुरूंकडे आले होते.
‘महापुरुषसंश्रय’ म्हणजेच सद्गुरूंचा सहवास, मंत्रोपदेश या गोष्टी भाग्यवशात प्राप्त होतात हे खरेच आहे; पण ती काही अंतिम गोष्ट नाही. संतांच्या सहवासाने व्यक्तीच्या स्वभावात पालट घडतो हेही खरे; पण ईश्वरप्राप्ती म्हणजे काय, याबद्दल पुरेशी सजगता सामान्यतः नसते. संतांच्या आणि त्यांच्या वाङ्मयाच्या पुन्हापुन्हा केलेल्या परिशीलनाने साधकवृत्ती निर्माण होते. देव म्हणजे नक्की कोण? तो असतो कुठे आणि कोणत्या स्वरूपात? त्याचा आणि माझा नेमका संबंध काय आहे? त्याची भेट होते म्हणजे नक्की काय होते, असे असंख्य प्रश्न अनेकांच्या बाबतीत अनुत्तरित राहतात. त्यामध्ये, सद्गुरूंच्या कृपेचा प्रश्न नसून शिष्याच्या जागरूकतेची आणि तत्परतेची उणीव, हेच कारण असते.
संतांचे ग्रंथ पूजनीय आहेत हे नि:संशय; पण त्यातील विचार समजून घेऊन आणि स्वतः उपासना करून ईश्वरदर्शनाला योग्य होणे, हे या ग्रंथांमागचे प्रयोजन आहे. तसे नसते, तर संतांनी वाङ्मयनिर्मिती केलीच नसती. केवळ आपली प्रतिमा, पादुका यांच्याच पूजनाची आज्ञा दिली असती. व्यवहारामध्ये काही प्रयत्न केल्याशिवाय प्राप्त होत नाही; तसेच अध्यात्मामध्येही समजून घेऊन उपासना करणारी व्यक्तीच स्वतःमध्ये ईश्वराचे दर्शन घेण्यास पात्र होते. प्रयत्नांच्या प्रत्येक टप्प्यासाठीची पात्रता हीच ईश्वरकृपा आहे.

