Mumbai Police Salary Scam: संशय निर्माण झाल्यानंतर ऑडिट करण्यात आले. या ऑडिटमध्ये २०१९ आणि २०२० या वर्षांतील काही महिन्यांच्या पगाराच्या रकमांमध्ये मोठी तफावत आढळली.

आठ ते दहा जणांना पोलिस असल्याचे दाखवून त्यांच्या नावाने असलेल्या बँक खात्यांवर पगाराच्या रकमा पाठविण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी पगार तसेच इतर प्रशासकीय कामे पहाणाऱ्या पाच अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरुद्ध समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता, FDA ला दंड लावावा लागेल, लायसन्स निलंबन मागे न घेतल्याने कोर्टाचा संताप
उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयातील पोलिस निरीक्षकाच्या तक्रारीवरून समतानगर पोलिस ठाण्यात, शासनाची फसवणूक करणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यांचा डेटा जुन्या ‘सेवार्थ’ वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये स्थलांतरित करताना ही संशयास्पद अनियमितता समोर आली. जे लोक पोलिस कर्मचारी नव्हते, त्यांना पोलिस कर्मचारी म्हणून दाखवण्यात आले आणि त्यांच्या नावावर वेतनाची प्रक्रिया करण्यात आली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर ऑडिट करण्यात आले. या ऑडिटमध्ये २०१९ आणि २०२० या वर्षांतील काही महिन्यांच्या पगाराच्या रकमांमध्ये मोठी तफावत आढळली.
मुंबई पोलिस दलातील प्रत्येक प्रादेशिक कार्यालयात पोलिसांचे पगार काढण्याचे काम चालते. मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी प्रादेशिक विभागात मोडणाऱ्या अधिकाऱ्यांचे कामाचे दिवस, थकबाकी तसेच इतर तपशील तयार करून लेखा विभागाकडे त्याचे देयक मंजुरीसाठी पाठवतात. हे काम करणाऱ्यांनी आठ ते दहा जणांच्या बोगस नोंदी करून पाठवल्या. अनियमितता समोर आल्यानंतर जेव्हा पगार घेणाऱ्या पोलिसांची नावे तपासण्यात आली, तेव्हा हे आठ ते दहा जण पोलिस नसल्याचे आढळले. ज्यांच्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्यात आले हे नेमके कोण आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याचबरोबर अशाप्रकारे धुळे आणि लातूर येथे कोट्यवधींचा पगार घोटाळा घडला होता, त्याचा या प्रकरणाशी संबंध आहे का, हेदेखील तपासले जात आहे.
Rohit Pawar : डॉक्टरांचा सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला, रोहित पवार यांनी दिली प्रकृतीबद्दल माहिती
यांच्या नावे काढले पगार
समतानगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या व्यक्तींच्या नावे पगार काढण्यात आले आहेत. या व्यक्ती पोलिस दलामध्ये कार्यरत नसल्याचे समोर आले आहे.
गुन्ह्यातील आरोपी
तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, प्रमुख लिपिक अजय राठोड, वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांच्यासह इतर आरोपींवर हा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

