वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करायला हरकत नाही; परंतु यांपैकी किती आंदोलक विद्यार्थी आहेत? किती जणांनी ‘नीट’ दिली आहे? त्यांचा आणि ‘नीट’चा संबंध तरी आहे काय? त्यांपैकी काहींना तर ‘नीट’चा अर्थही माहीत नाही…’
दिल्लीतील ‘जंतर मंतर’वरील आंदोलनावर भाष्य करताना विचारले गेलेले हे काही प्रश्न. खरे तर ते ‘नीट’शी संबंध नसलेल्यांच्या आंदोलनातील सहभागावर घेतले गेलेले आक्षेपच. ज्यांना समस्या भेडसावतेय किंवा जे समस्याग्रस्त आहेत, त्यांनीच आंदोलन करावे, असे गृहीतक त्यामागे दिसते. ते अर्थातच चुकीचे; कारण पेपरफुटीचा प्रकार ही केवळ संबंधित विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून, ती एक गुन्हेगारी घटना आहे आणि त्याच्या मुळाशी आहे, भ्रष्ट प्रवृत्ती. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना विरोध करणे, त्यांमधील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी आग्रह धरणे आणि सरकारला उत्तरदायी करणे हे साऱ्या समाजाचे कर्तव्य. त्यामुळे संबंधितांनीच आवाज उठवायला हवा, हा मुद्दा तर्कविसंगत ठरतो.
तरीही आपल्याकडे कोणत्याही सार्वजनिक प्रश्नांवर आंदोलने सुरू झाली, की करणाऱ्यांवर आक्षेप घेतले जातात आणि त्यांच्या हेतूंबद्दल संशय व्यक्त होतात. गेल्या दोन-अडीच दशकांत देशात सार्वजनिक प्रश्न आणि समस्या यांच्यावरील उत्तरे शोधण्यात झालेले बदल, हे यामागचे एक ठळक कारण. उदारीकरणाची आणि खासगीकरणाची प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी देशात सार्वजनिक प्रश्नांवर संबंधित यंत्रणांना आणि सरकारला उत्तरदायी धरले जात असे. आताही तसे होते; परंतु त्याचे प्रमाण खूपच कमी. सरकारी शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक कार्यक्षम करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्यासाठी व्यापक प्रमाणावर आग्रह धरला जात नाही; कारण या सार्वजनिक प्रश्नांवर लोकांनी खासगी उत्तरे शोधली आहेत.
आजचे बहुतेक पालक आपल्या मुलांना खासगी (इंग्लिश माध्यमाच्या) शाळांत पाठवितात. राष्ट्रीय नमुना चाचणीच्या आकडेवारीनुसार, १९९०च्या सुमारास देशात खासगी शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण १० ते १५ टक्के होते; ते आता ४५ ते ५० टक्क्यांवर गेले आहे. यांपैकी ३३ टक्के विद्यार्थी खासगी विनाअनुदानित शाळांत जातात. बालवाडीला एक लाख रुपयांहून अधिक शुल्क आकारणाऱ्या शाळांत आपल्या मुलांना पाठविण्यामागे पालकांच्या वाढत्या आकांक्षा आहेत हे खरे; परंतु त्याचबरोबर सरकारी शाळांमधील गुणवत्तेची वेगाने झालेली घसरण हेही कारण आहे. सरकारी शाळांचा घसरलेला दर्जा हा सार्वजनिक प्रश्न खरा; परंतु त्यावर पालकांनी मुलांना खासगी शाळांत पाठवून आपल्यापुरते उत्तर शोधले आहे. यामुळे सार्वजनिक शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याचा, त्यासाठी सरकारची गुंतवणूक वाढावी, असा आग्रह धरला जात नाही. एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) सहा टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करण्याची शिफारस कोठारी समितीने केली, त्याला आता साठ वर्षे झाली; परंतु ती अद्याप अंमलात आलेली नाही. शिक्षणावर ‘जीडीपी’च्या जास्तीत जास्त चार टक्के रक्कम खर्च होत असे; हे प्रमाणही आता कमी झाले आहे.
गेल्या काही वर्षांत पुण्यासह देशात अनेक बड्या शहरांत मेट्रो उभारल्या जात आहेत हे खरे; परंतु तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक वाहतूक किफायतशीर, वक्तशीर आणि दर्जेदार नसणे ही समस्या सर्वांचीच; परंतु खासगी दुचाकी वा चारचाकी वाहने घेऊन लोकांनी आपल्यापुरती ही समस्या सोडवली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नाला खासगी रुग्णालयांचे उत्तर आहे. इतकेच कशाला, दररोज पाणी न येत नसेल, तर खासगी टँकर मागवून लोकांनी पाण्याचा प्रश्नही आपल्यापुरता सोडविला आहे.
एकंदरीत, सार्वजनिक प्रश्नांना खासगी उत्तरे हे आजच्या काळाचे वैशिष्ट्यच. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या माध्यमातून देशातील तरुणाईने याला छेद देण्याचा केलेला प्रयत्न म्हणूनच लक्षवेधक ठरला आहे.
Shridhar.Loni@timesofindia.com

