Headlines

Mumbai protest police threaten students framing false cases video goes viral; यह फंस गया! मुंबईत दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, कॅमेरा सुरू असल्याचं कळलंच नाही अन् सगळा खेळ उघड


मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि २० जुलै रोजी झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईतही तरुणाई पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता दादर येथील शिवाजी पार्क आणि चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात शेकडो विद्यार्थी, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. हातात निषेधाचे फलक, गुलाबाची फुले आणि चॉकलेट घेऊन त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करत केंद्र सरकार आणि पोलिस कारवाईविरोधात आवाज उठवला. मात्र जमावबंदीच्या आदेशानंतरही तरुणाई उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. अशातच आंदोलकांना वैतागलेल्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हिडिओनुसार, मुंबई पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन आपल्या वाहनात बसवलं होतं. त्यानंतर समोरच्या सीटवर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सदर विद्यार्थ्यांना धमकी देण्यास सुरुवात केली. या विद्यार्थ्यांनी आपल्या फोनचा कॅमेरा सुरू करून हा सगळा प्रकार चित्रित केला आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी म्हणताना दिसत आहे की, “परत जर या परिसरात दिसला तर माझ्यासारखा बेकार माणूस नाही. नाहीतर मी खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन. मग जामीनही मिळणार नाही. तुम्हा लोकांमुळे सध्या आम्हाला त्रास होत आहे.”

दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलक विद्यार्थ्यांना थेट खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचं या व्हिडिओत दिसत असल्याने पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलिसांकडून या व्हिडिओबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. ‘मटा ऑनलाइन’ या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

मुंबईत तरुणांनी उडवली पोलिसांची झोप

दिल्लीतील घटनेनंतर देशभरात आंदोलनाची व्याप्ती वाढत असून मुंबई त्याला अपवाद ठरली नाही. गेल्या दोन दिवसांपासून दादर परिसरात आंदोलने होत असून, यापूर्वी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे बुधवारीही दादर आणि चेंबूर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, त्यानंतरही आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आपली भूमिका मांडली.

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रतीकात्मकता. घोषणाबाजीसोबत अनेक तरुणांच्या हातात गुलाबाची फुले आणि चॉकलेट दिसत होते. संताप व्यक्त करतानाही संवाद, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास असल्याचा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेकांनी संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रती हातात घेतल्या होत्या, तर काहींनी शिक्षणव्यवस्था, परीक्षांमधील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर फलक झळकवले. ‘आम्हाला भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेतून स्वातंत्र्य हवे’, ‘वी वाँट जस्टिस’, ‘विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका’, ‘लोकशाही वाचवा’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.