नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील 24 लाख विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ झाला असून, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ 21 दिवस उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्याशी संवाद न साधणे हा सत्तेचा माज असल्याचे शेट्टी म्हणाले. सरकारने न्यायव्यवस्थेचा किंवा पोलिसांचा वापर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास, या देशात श्रीलंका किंवा बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.