Wagholi Water Supply Project: वाघोली परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेवर गेल्या ३० महिन्यांपासून काम सुरू असून जल वाहिन्यांचे जाळेही उभारले आहे.
उदय ब्राम्हणे, शिरूर: वाघोली आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येची तहान कायमची भागविण्याचा दावा करीत सुरू करण्यात आलेल्या २३० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ३० महिन्यांपासून काम सुरू आहे. कोट्यवधी खर्च झाला, वाहिन्यांचे जाळे उभे राहिले; पण या योजनेसाठी अधिकृत पाण्याचा कोटाच अद्याप मंजूर झालेला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली .
नियमांनुसार कोणतीही पाणीपुरवठा योजना सुरू करण्यापूर्वी संबंधित जलस्रोतामधून किती पाणी उपलब्ध होणार, याची पाटबंधारे विभागाकडून अधिकृत मंजुरी घेणे बंधनकारक असते. त्यानंतरच कोट्यवधींच्या कामांना मंजुरी दिली जाते. मात्र, वाघोलीच्या बाबतीत चित्र पूर्णपणे उलटे दिसत आहे. कोटा मंजूर नसताना काम मात्र जोमात सुरू आहे.
योजनेचे काम अंतिम टप्प्याकडे जात असताना सर्वांत मूलभूत प्रश्न अनुत्तरित आहे. तो म्हणजे ‘पाणी येणार कुठून?’ यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, सार्वजनिक पैशांचा वापर योग्य नियोजनाशिवाय होत आहे का? असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे पाण्याच्या कोट्याचा मंजुरी आदेश, संबंधित कागदपत्रे आणि संपूर्ण योजनेचा वस्तुनिष्ठ खुलासा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा या योजनेविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पुणे शहरालाच सध्या अपुरा पाणीपुरवठा होत असून, शहरासाठी अतिरिक्त कोट्याची मागणी सुरू आहे. अनेकदा शहरातील अनेक भागात नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत त्याच मर्यादित पाणीसाठ्यातून वाघोली आणि परिसराला पुरेसा पाणीपुरवठा कसा होणार, याचे उत्तर प्रशासनाकडे अद्यापही नाही. यामुळे कोट्यवधीं रुपयांची योजना प्रत्यक्षात कागदोपत्रीच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘पाण्याचा स्वतंत्र कोटा मंजूर नाही’
पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (पाणीपुरवठा विभाग) नंदकुमार जगताप यांनी सांगितले, की ‘वाघोलीसाठी पाटबंधारे विभागाकडून स्वतंत्र पाण्याचा कोटा अद्याप मंजूर झालेला नाही. शहराच्या उपलब्ध – पाणीपुरवठ्यातून वाघोलीला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.’ “पुणे शहरालच पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. अशा परिस्थितीत शहराच्या उपलब्ध पाण्यातून वाघोलीला पाणी देण्याचे सांगणे, ही दिशाभूल आहे. २३० कोटींची योजना अनिश्चिततेत आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने अधिकृत पाण्याचा कोटा मंजूर करून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा,” कल्पेश जाचक, अध्यक्ष, श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान
‘पुढील २५ वर्षांचा विचार करून पुणे शहरासाठी एकात्मिक जलशुद्धीकरण ‘मास्टर प्लॅन’ तयार करावा,’ असे निर्देश स्थायी समितीने पुणे महापालिकेच्या प्रशासनाला दिले आहेत; तसेच जुने पर्वती व लष्कर जलशुद्धीकरण केंद्रांचे तातडीने आधुनिकीकरण करून त्यांची कार्यक्षमता वाढवावी, असेही म्हटले आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा