भारत छोडो आंदोलनादरम्यान ९ आणि १० ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. शहरात ठिकठिकाणी मोठ्या मिरवणुका काढण्यात आल्या. स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांच्या सरकारी इमारतींवर दगडफेक केली. विजेचे खांब, दिवे आणि दारूची दुकाने लक्ष्य करण्यात आली. इंग्रज सरकारची वाहतूक रोखण्यासाठी आंदोलकांनी रस्त्यांवर मोठे लोखंडी पाइप टाकून मार्ग अडवले.
Nagpur Crime : दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला, बाहेर जातो सांगून पुन्हा परतलाच नाही, 20 वर्षीय तरण्याबांड पोराला संपवलं; घटनेचं गूढ वाढलंपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी लाठीमार, अश्रूधूर आणि थेट गोळीबाराचा अवलंब केला. या आंदोलनात ‘हिंदुस्तानी सेवा दल’, ‘रेड आर्मी’ आणि ‘वानर सेना’ यांसारख्या विद्यार्थी व युवक संघटनांनी रेल्वे, टपाल कार्यालये आणि सरकारी इमारतींवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. जंगलू वाडीवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही नागपुरातील शासकीय कार्यालयांवर ताबा मिळवण्यासाठी लढा उभारला होता.
इंग्रजांनी नागपूर शहरात संचारबंदी लागू केली. नागरिकांवर ५० हजार रुपयांचा सामूहिक दंडही ठोठावण्यात आला. ऑगस्ट १९४२मध्ये इंग्रजी सत्तेविरोधात निघालेल्या एका निदर्शनात सहभागी असताना पोलिसांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात जंगलू वाडीवरे गंभीर जखमी झाले. त्याच दिवशी त्यांना वीरमरण आले. नागपूरच्या या युवा क्रांतिकारकाचे बलिदान ‘चले जाव’ आंदोलनाच्या इतिहासात कायम स्मरणात राहिले.
पोस्ट ऑफिसला आग, कामठीवरून सैन्य
९ ऑगस्टपासून पुढील आठ-दहा दिवस नागपूर धगधगत होते. पोलिसांच्या गोळीबारात अनेकजण शहीद होत होते. १२ ऑगस्ट रोजी तर शहराला रणांगणाचे स्वरूप आले. याच दिवशी संतप्त नागरिकांनी इतवारी पोस्ट ऑफिसला आग लावली. या कारवाईत हिंदुस्थानी लालसेनेचे बाबुलाल गौर, विठ्ठलप्रसाद शुक्ला, मारोती उरेंवर, बापुलाल बावरिया आणि ईश्वरलाल लांबजिया यांचा पुढाकार होता. इतवारी पोस्ट ऑफिस जाळल्याचे कळताच पोलिस तिकडे निघाले. मात्र, आंदोलकांनी त्यांना बडकस चौकात रोखले. तेथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. यानंतर टांगा स्टँड चौकात, म्हणजेच खुळे चौकात, पुन्हा गोळीबार झाला. यात तिघांचा मृत्यू झाला. परिस्थिती अधिकच चिघळत असल्याचे पाहून कामठीवरून सैन्य बोलावण्यात आले होते.
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार; सावजी मटणावरून आता युवा संघटनेचा आक्रमक इशारा, ‘माफी मागा अन्यथा कोर्टात खेचू’!कृष्णराव काकडे यांचे बलिदान
१३ ऑगस्ट १९४२ रोजी सकाळी एक मोर्चा शनिचरा पुलाजवळील पोद्दारेश्वर राम मंदिराजवळील पोस्ट ऑफिसजवळ पोहोचला. पोस्टातील रक्कम बाहेर काढून तिचा ढीग करण्यात आला. काही लोक त्यातील नोटा घेऊन पळू लागले. तेव्हा कृष्णराव काकडे आणि लालसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तसे न करण्यास सांगितले. त्यानंतर संपूर्ण रक्कम आणि कागदपत्रांची होळी करण्यात आली. याच वेळी अर्बन इन्फन्ट्रीचे सैनिक पोद्दारेश्वर राम मंदिराजवळील रेल्वे पुलावर पोहोचले. त्यांनी पुलावरून गोळीबार सुरू केला. पहिली गोळी लालसेनेच्या एका सैनिकाला लागली. त्यावेळी लोकांच्या गर्दीतून कृष्णराव काकडे पुढे आले. ‘गोळ्या चालवू नका आणि चालवायच्याच असतील तर माझ्यावर चालवा,’ असे त्यांनी ब्रिटिश सैनिकांना उद्देशून सांगितले. यानंतर एका सैनिकाने काकडे यांच्यावर गोळी झाडली. ती त्यांच्या छातीतून आरपार गेली आणि मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यालाही चाटून गेली. तरीही काकडे ‘भारत माता की जय’ म्हणत पुढे चालत राहिले. मेयो हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीजवळील पंजाबी हॉटेलजवळ ते कोसळले. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.
सतराव्या वर्षी फासावर
१९४२च्या भारत छोडो आंदोलनात शहीद शंकर महाले यांचे वडील दाजिबा यांना शुक्रवारी तलावाजवळ गोळी लागली. त्यातच त्यांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर शंकर महालेही आंदोलनात उतरले. त्यांनी नवाबपुरा येथील पोलिस चौकी जाळली. या घटनेत एका जमादाराचा मृत्यू झाला. इंग्रजांनी शंकर महाले यांना अटक केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे १६ वर्षे होते. त्या काळात सतरापेक्षा कमी वयाच्या मुलाला फाशी देता येत नव्हती. त्यामुळे हा खटला वर्षभर चालला. अखेर १९ जानेवारी १९४३ रोजी वयाच्या सतराव्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फाशी दिली. त्यावेळी ‘वडील गोळीने गेले, पुत्र फासावर लटकला’, अशी म्हण प्रचलित झाली होती. स्वातंत्र्यानंतर महाल परिसरातील झेंडा चौक येथे त्यांच्या स्मृत्यर्थ स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते.

