Student Protest: दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सचिन तेंडुलकर, शुभमन गिल, युवराज सिंहसह क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं कोण काय म्हणाले?

सचिन तेंडुलकरने काय म्हटलं?
सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांचा दाखला देत शिक्षण आणि मूल्यांबाबत भाष्य केलं आहे. सचिनचे वडील प्राध्यापक होते. त्यांनी अनेक तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याचं सचिनने सांगितलं. लहानपणापासूनच आपल्याला अपयश स्वीकारणं ठीक आहे, मात्र फसवणूक कधीही मान्य करू नये आणि आयुष्यात शॉर्टकटचा मार्ग निवडू नये, हे शिकवलं गेलं, असं सचिनने म्हटलं. समाजानेही केवळ निकालाला महत्त्व देण्याऐवजी मेहनत आणि योग्य मूल्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, अशी भूमिका त्याने मांडली.
शुभमन गिलने विद्यार्थ्यांना दिला पाठिंबा
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलनेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. एका तरुण भारतीयाच्या नात्याने प्रत्येक तरुणाला शिकण्याची, स्वप्न पाहण्याची आणि आपलं भविष्य घडवण्याची संधी मिळायला हवी, असं गिलने म्हटलं. शांततेच्या मार्गाने आपला आवाज उठवणाऱ्या तरुणांबद्दल त्याने आदर व्यक्त केला. ‘शिक्षणात आपल्या देशाचं भविष्य घडवण्याची ताकद आहे. आपण संवेदनशीलता, परस्पर सन्मान आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हिताचा विचार करून पुढे जाऊ,’ अशी अपेक्षाही गिलने व्यक्त केली.
युवराज सिंहनेही मांडली भूमिका
माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनेही विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. प्रत्येक मुलाला आणि विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरणात शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळायला हवी, असं त्याने म्हटलं. विद्यार्थ्यांचं कल्याण हाच चांगल्या भारताचा पाया असल्याचं सांगत युवराजने सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. प्रत्येकाला संधी आणि आशा मिळेल, असा समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. संवादाच्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढता येईल, असंही त्याने म्हटलं.
मोहम्मद कैफ पोलिसांच्या कारवाईवर नाराज
माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. एक वडील म्हणून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी गैरवर्तन होताना पाहून दुःख होत असल्याचं कैफने म्हटलं. दिल्लीच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांवर होणारा लाठीचार्ज थांबायला हवा, अशी भूमिका त्याने मांडली. तसेच लवकरच या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी अपेक्षाही कैफने व्यक्त केली.
इरफान पठाणनेही विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली
माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा उल्लेख करत त्यांना पाठिंबा दिला. प्रत्येक विद्यार्थी चांगल्या भविष्यासाठी अनेक वर्षे मेहनत करतो. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडूनही अनेक त्याग केले जातात, असं पठाणने म्हटलं. पेपर लीकसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या आशा आणि स्वप्नांवर परिणाम होऊ नये, असं त्याने स्पष्ट केलं. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य संधी मिळेल, याची खात्री करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पावलं उचलावीत, अशी अपेक्षाही पठाणने व्यक्त केली. ‘आपले विद्यार्थी हेच आपलं भविष्य आहेत. त्यांच्या स्वप्नांचं रक्षण करा,’ असा संदेश इरफान पठाणने दिला.

