Mumbai-Pune Travel: द्रुतगती महामार्गावर कनेक्टिंग लिंकचं लोकार्पण झाल्यानंतर मार्गाच्या दहापदरीकरणाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. आता केंद्र सरकारकडे जुन्या महामार्गाच्या विस्ताराचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे.
पुणे: मुंबई-पुणेदरम्यान वाहतुकीचा वाढता भार पाहता राज्य सरकार जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चार पदरी असणारा हा महामार्ग सहा पदरी करण्यात येणार आहे. मुंबई ते पुणे वाहतूक सुधारण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये अनेक उड्डाणपूल, इंटरचेंज, पूर्ण झालेला कनेक्टिंग लिंक मार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दहा पदरीकरणाचा समावेश आहे.
१६ पदरी मार्गांवरून वाहतूक होणार
सध्या जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि नव्या द्रुतगती महामार्गांवर एकत्रितपणे दहा पदरी वाहतूक सुरू आहे. दोन्ही महामार्गांचा विस्तार झाल्यानंतर १६ पदरी मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे भविष्यात वाढणरी वाहतूककोंडी हाताळणं शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( MSRDC ) जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला सहा पदरी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे. प्रकल्पाचा अंतिम आराखडा कसा असेल हे अहवाल तयार झाल्यानंतरचं समोर येईल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या विस्तारासाठी प्रस्ताव केंद्र सरकारडे पाठवला आहे. या प्रकल्पासाठी ७,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. काम सुरू झाल्यावर तीन वर्षांत या मार्गाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. खंडाळा, लोणावळा, खोपोलीसाठी बायपास मार्ग, कळंबोली ते शिळफाटा आठपदरी रस्ता, इंटरचेंज आणि तळेगाव, खोपोली आणि खालापूरसारख्या ठिकाणांवर तब्बल १३ उड्डाणपुलांचा या प्रकल्पात समावेश असेल.
जुना मुंबई-पुणे महामार्ग इंग्रजांच्या काळात १९व्या शतकात सुरू झाला होता. पूर्वी पेशव्याचं केंद्र असलेल्या पुणे ते मुंबई (त्या काळातील ‘बॉम्बे’)या दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करताना काही दिवस लागायचे. डोंगर पार करून, नद्या पार करून अंतर पार करावं लागत होतं. हाच राष्ट्रीय महामार्ग (NH-48) आता मुंबईला पुण्याशी आणि पुढे बंगळुरू ते चेन्नईपर्यंत जोडतो.
द्रुतगती महामार्गाची ४ वर्षांत क्षमता वाढणार
दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचंही रुंदीकरण केलं जाणार आहे. महमार्गाला सहा पदरी मार्गावरून १० पदरी करण्याचं कामही ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतलं आहे. या प्रकल्पासाठी १४,००० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी या मार्गाचं रुंदीकरण सुरू करून पुढील चार वर्षांत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. २०३० पर्यंत जुना आणि नवीन अशा दोन्ही महामार्गांचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढवण्यासाठी १ मे रोजी महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन केलं. आता या मार्गाला कनेक्टिंग लिंक असं नाव दिलं गेलं आहे. तब्बल ६,७९० कोटी रुपये खर्च करून हा दोन बोगदे आणि एक केबल-स्टेड पूल असलेला मार्ग तयार करण्यात आला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे रिंग रोड, पुणे-नाशिक द्रुतगती महामार्ग आणि पुणे-संभाजीनगर महामार्ग या प्रस्तावित प्रकल्पांमुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या एका अधिकाऱ्याने ‘इंडिया टुडे’शी बोलताना दिली. पुढील ५० वर्षांत या मार्गांवर अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याची योजना आहे,
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा