या पृथ्वीवर अशी काही स्थाने आहेत, की ज्यांसंबंधी खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. या स्थानांमध्ये कोणाचेही वास्तव्य नसते. असेच एक जगातील सर्वात एकाकी मानले गेलेले स्थान दक्षिण प्रशांत महासागरात आहे. हे एक छोटे बेट असून, अर्थातच त्याच्या चारही बाजूंना केवळ समुद्र आहे. या बेटाला ‘पॉइंट नीमो’ असे नाव आहे. येथे कोणीही वास्तव्य करत नाही. पृथ्वीवर असे भूभाग आज क्वचितच पहावायास मिळतात, की जेथे औषधालाही कोणी मानव रहात नाही. या बेटापासून सर्वात जवळची भूमीही हजारो किलोमीटर अंतरावर आहे. अशा या निर्मनुष्य स्थानाचे एवढे कौतुक कशासाठी, असाही प्रश्न आपल्या मनात आल्यावाचून राहणार नाही. इतर कोणत्याही दृष्टीने हे बेट मानवाला उपयुक्त नाही, ही वस्तुस्थिती आहे. येथे कोणतीही नैसर्गिक संपत्ती अगर खनिजांच्या खाणी नाहीत. फारशी सुपिकताही नाही. एकंदरीत, माणसाला आज ज्या बाबींची आवश्यकता भासते, असे काहीही येथे नाही. तरीही, त्याच्या एका उपयुक्ततेमुळे त्याचे जगासाठी मोठे महत्व आहे. या बेटासंबंधीची सर्वात उपयुक्त बाब त्यांचे इतर भूभागांपासून प्रचंड दूर असणहृ हीच आहे. मानवाने अंतरिक्षात जे उपग्रह सोडलेले आहेत, त्यांचे विशिष्ट आयुष्य असते आणि ते संपल्यानंतर ते निकामी होतात. हे उपग्रह किंवा त्यांची काही भाग नंतर पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात आणि पृथ्वीवर पडतात. ते मानवी वस्तीवर किंवा तिच्या आसपास पडू नयेत, याची दक्षता घ्यावी लागते. या कामासाठी या बेटाचा संशोधकांनी उपयोग करुन घेतला आहे. या बेटावर किंवा त्याच्या अवती-भोवती असणाऱ्या समुद्रात हे पडलेल्या उपग्रहांचे तुकडे पडतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्मनुष्य आणि एकाकी बेटामुळे पृथ्वीच्या इतर गजबजलेल्या मानव वस्त्यांचे संरक्षण होत आहे. हाच या स्थानाचा उपयोग आहे.
