Railway Crossings: राज्यात रेल्वे फाटक ओलांडताना अनेक अपघात होतात. अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध नसतात. येत्या तीन वर्षांमध्ये हेच बदलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. राज्यात रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामाला प्राधान्य दिलं जाणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. लवकरच रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र पाहायला मिळेल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
येथील वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रस्ता, उड्डाणपूल; तसेच राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या नऊ महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोरेशन लिमिटेड (महारेल) यांनी या प्रकल्पाचे काम केले आहे. या लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते.
‘ रेल्वे फाटक नसल्याने दर वर्षी २१ हजार लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे,’ असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘राज्यात ५२४ रेल्वे फाटकांची आवश्यकता असून, त्यापैकी दहा हजारपेक्षा जास्त दळणवळणांतर्गत असलेल्या १२१ फाटकांसोबतच इतरही १४५ रेल्वेवरील पुलांच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. हे संपूर्ण काम येत्या तीन वर्षांत ‘महारेल’तर्फे पूर्ण करण्यात येणार आहे.’
‘रेल्वे प्रकल्पासंदर्भातील बांधकामसाठी महारेलची स्थापना केल्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे,’ असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आरओबीला सोनबोईर यांचे नाव
भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्ग या रेल्वे ओव्हर ब्रिजला माजी उपमहापौर बाहरीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पारडी येथील उड्डाणपुलासोबतच येथील व्यावसायीकांसाठी आधुनिक भाजी मार्केट तसेच स्पोर्ट क्लब बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या १५० कोटी रुपयाच्या खर्चापैकी ४० कोटी रुपयाचा निधी एनएचआयतर्फे देण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. नागपूर येथील दोन प्रकल्प केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधाअंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे. सात प्रकल्प रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ५०-५० टक्के खर्च वाटपाच्या तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहे, असे राजेशकुमार जयस्वाल म्हणाले.
दरम्यान, स्वच्छता कर्मचाऱ्यासह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, नागपूर महापालिकेत लवकरच लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार ५०० पात्र स्वच्छता कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश दिले जातील. तसेच त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. महापालिकेतर्फे मौजा नारी येथे साकारण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा