Headlines

खरीप पेरण्या ८२ टक्केच! राज्यात पावसाचा वेग वाढूनही शेतीच्या कामांची गती मंदावली| Maharashtra Times


Kharif Sowing: केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार , देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनच्या पावसात सुधारणा झाल्यामुळे गेल्या काही आठवड्यांत पेरणीतील एकूण तफावत कमी झाली असली तरी,प्रमुख खरीप पिकांची गेल्या वर्षीच्या पातळीपेक्षा कमीच राहिले आहे.

खरीप पेरण्या ८२ टक्केच!
सौरभ शर्मा, मुंबई: राज्यात यंदा एक जून ते २७ जुलैदरम्यान सरासरीच्या ९४ टक्के पाऊस पडला असला, तरी खरीप पेरणीने अपेक्षित वेग पकडलेला नाही. राज्यातील सरासरी १४४.३६ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत आत्तापर्यंत ११७.६९ लाख हेक्टरवर म्हणजेच, ८२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित क्षेत्रात अजूनही पावसाच्या अनुकूलतेची प्रतीक्षा असल्याचे चित्र समोर आले आहे. ही माहिती मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीपुढे सादर करण्यात आलेल्या कृषी विभागाच्या आढावा सादरीकरणातून पुढे आली.

राज्यात आत्तापर्यंत ४६६.८ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या ९४ टक्के आहे. पेरणी झालेल्या बहुतांश भागात पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहेत. भात व नाचणीची पुनर्लागवड सुरू असून मूग आणि उडीद पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत पोहोचली आहेत. उर्वरित भागात पेरणीचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.

Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, तीन दिवस कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार

अशी आहे आकडेवारी

पीकनिहाय आकडेवारीनुसार, सोयाबीनची पेरणी सरासरीच्या ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचली असली तरी भाताची पेरणी केवळ ३९ टक्के, बाजरीची ४९ टक्के, रागीची २५ टक्के, मूग व उडीद प्रत्येकी ४५ टक्के, तर कापसाची पेरणी ८६ टक्के झाली आहे. त्यामुळे काही भागांतील पावसाच्या विषम वितरणाचा परिणाम पेरणीवर झाल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाच्या वितरणातही मोठी तफावत दिसून येते. नंदुरबारमध्ये सरासरीच्या केवळ ३९ टक्के पाऊस झाला असून १४ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्केच पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.

दुसरीकडे ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरसह आठ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे उर्वरित क्षेत्रातील पेरणीला गती मिळण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. २७ जुलैअखेरीस युरियाचा ५.२१ लाख टन साठा उपलब्ध होता. तर, ९.३७ लाख टन युरियाची विक्री झाली आहे, असे विभागाने म्हटले आहे.

Maharashtra TimesMumbai Local: महामुंबईत रेल्वेविस्ताराचे लक्ष्य; पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचाही विकास

२०, ५२३ हेक्टर क्षेत्र बाधित

राज्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून २७ जुलैपर्यंतच्या प्राथमिक अहवालानुसार ९,१५७ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. रायगड, पुणे, बुलढाणा, वर्धा, नाशिक, रत्नागिरी आणि पालघरसह नऊ जिल्ह्यांतील भात, सोयाबीन, कापूस, मका, भाजीपाला आणि फळपिकांना फटका बसला आहे. त्याआधी जूनमधील अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे १८ जिल्ह्यांतील २०,५२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाने यामध्ये दिली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा