India vs Sri Lanka 1st Test Day 5 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटी निर्णायक वळणावर आली आहे. श्रीलंकेला विजयासाठी २८८ धावा हव्या असून त्यांचे ६ फलंदाज बाकी आहेत. भारताला विजयासाठी ६ विकेट्सची गरज आहे. मात्र, पावसाचा अंदाज टीम इंडियाची चिंता वाढवणारा आहे.

सध्या सर्व भारतीय चाहत्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे की, भारतीय गोलंदाज श्रीलंकेच्या उर्वरित फलंदाजांना लवकर बाद करू शकतील की श्रीलंका हे आव्हान पार करेल? की नेहमीप्रमाणे पाऊस येऊन या संपूर्ण रोमांचक सामन्यावर पाणी फेरेल?
सामना अनिर्णित राहिला, तरी भारताचे मोठे नुकसान
भारतीय संघासाठी या सामन्यात फक्त आणि फक्त विजयच महत्त्वाचा आहे. जर हा सामना पावसामुळे अनिर्णित (Draw) राहिला, तरीही ती भारताचा एक प्रकारे पराभवच मानला जाईल. कारण, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला ही मालिका जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. जर श्रीलंकेने २८८ धावा करून हा सामना जिंकला, तर भारताचे WTC फायनलचे स्वप्न जवळपास भंग पावले, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणेच भाग आहे.
श्रीलंकेची मधली फळी ठरणार डोकेदुखी?
श्रीलंकेला विजयासाठी ९० षटकांत २८८ धावांची गरज असून त्यांचे ६ फलंदाज बाकी आहेत. सध्या कर्णधार धनंजय डी सिल्वा ३१ धावांवर आणि पहिल्या डावात शतक झळकावणारा सोनल दिनुषा २५ धावांवर नाबाद खेळत आहेत. चौथ्या दिवशी ४७ धावांवर ४ विकेट्स पडल्यानंतर या दोघांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाचा डाव सावरला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या डावातही श्रीलंकेची अवस्था ५ बाद ९० अशी बिकट झाली असताना दिनुषा आणि डिकवेला यांनी मोठी भागीदारी करत संघाला २८४ धावांपर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर आज या दोघांची जोडी लवकरात लवकर फोडण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल.
पाऊस ठरणार सर्वात मोठा ‘व्हिलन’
गॉल कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका कोणता असेल, तर ते म्हणजे हवामान! गॉलमध्ये बुधवारी मुसळधार पावसाची तब्बल ८५ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. चारही दिवशी पावसाने सामन्यात कमी-अधिक प्रमाणात व्यत्यय आणला आहे. अशा परिस्थितीत पाचव्या दिवशी पूर्ण ९० षटकांचा खेळ होणे जवळपास अशक्य वाटत आहे. श्रीलंकेला उर्वरित २८८ धावा करणे कठीण असले तरी, जर पावसाने सामन्यातील बहुतांश वेळ हिरावून घेतला, तर भारताला ६ विकेट्स काढण्यासाठी पुरेसा वेळच मिळणार नाही.
भारतीय गोलंदाजांवर मोठी मदार
त्यामुळे उद्या निर्णायक दिवशी मोहम्मद सिराज, मानव सुथार, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांची एक मोठी भागीदारी भारतासाठी मोठी अडचण ठरू शकते.
Kavya Maran : शुभमंगल सावधान! हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली, विदेशात बांधणार लग्नगाठ?
सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, हा सामना ६० टक्के भारताच्या बाजूने, ३० टक्के पावसाच्या आणि केवळ १० टक्के श्रीलंकेच्या बाजूने झुकलेला दिसत आहे. त्यामुळे उद्या पावसाचा व्यत्यय कमीत कमी असावा आणि श्रीलंकेचा डाव गुंडाळण्यासाठी पुरेशी षटके मिळावीत, अशीच प्रार्थना भारतीय संघ आणि चाहते करत आहेत. आता या थरारक कसोटीचा निकाल काय लागतो, हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.

