![]()
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “कर्जमाफीची घोषणा आणि प्रत्यक्ष वस्तूस्थिती यामध्ये मोठा फरक असून, सरकारने शेतकऱ्यांशी राजकीय डावपेच खेळणे थांबवावे, अन्यथा पेचात पडाल,” असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. ट्विटर एक्सवरुन त्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘अटीशर्तींचा कोलदांडा अन् अंमलबजावणी शून्य’ राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवर टीका करताना रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “घोषणा आणि वस्तूस्थिती यात फरक असतो, हे सरकारने आधी लक्षात घ्यावं! आधी कर्जमाफीची घोषणा केली पण नंतर त्यात अटीशर्ती टाकून स्वतःच्याच घोषणेला कोलदांडा घातला. आम्ही शेतकऱ्यांसोबत आंदोलन केल्यानंतर आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी अटीशर्ती काढल्याची घोषणा केली. पण, त्याची अंमलबजावणी मात्र अजूनही शून्य आहे.” ‘दुष्काळात तेरावा महिना’ सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटामुळे अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असल्याचे रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, “आधीच खऱ्या दुष्काळाच्या सावटामुळे शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे आणि दुसरीकडे सरकार मात्र त्यांच्याशी राजकीय डाव खेळत आहे. सरकारचे हे वागणे म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशाच स्वरूपाचे आहे.” ‘शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नका, अन्यथा…’ रोहित पवार यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा देताना दिल्लीतील राजकीय घडामोडींचाही संदर्भ दिला आहे. ते म्हणाले, “माझी सरकारला विनंती आहे की, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा. पण शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळलात, तर तुम्हीच पेचात पडाल. कर्जमाफीसाठी आता ‘तारीख-पे-तारीख’चा खेळ बंद करा आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करा. दिल्लीत सरकारची कशी फजिती सुरूये, हे बघताय ना?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. हेही वाचा.. CJPचे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू: समर्थकांनी रात्रीतून पुन्हा स्टेज उभा केला; अभिजीत दीपके म्हणाले- आज पुन्हा संसद मार्च कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP चे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. CJP च्या संसद मार्चनंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता जंतर-मंतर रिकामे केले होते. पण, आंदोलक आणि अभिजीत दीपके 6 तासांनंतर पुन्हा परतले. सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दीपके यांनी इंडिया टुडेसोबत खास बातचीतमध्ये सांगितले की, ते मंगळवारीही संसद मार्च करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. आम्ही जंतर-मंतरवरून हटणार नाहीत. सविस्तर वाचा
Source link
शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नका:दिल्लीत सरकारची कशी फजिती सुरूये बघताय ना?; रोहित पवारांचा थेट इशारा
