Headlines

मनोज जरांगे यांची भेट घेणार, आरक्षणाच्या कायदेशीर पेचातून मार्ग काढणार, विखे पाटील यांची भूमिका


मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी प्रचंड आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्टला ते आंदोलनाला बसणार आहेत. याआधी ते राज्यभरात दौरा करत आहेत. त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाकडून उत्सफूर्त प्रतिसादही मिळत आहे. या सगळ्या घडामोडींवर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Vikhe patil on manoj jarange
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उपवर्गीकरण, 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण नेण्याचा मुद्दा आणि कायदेशीर गुंतागुंतीवर सरकार सकारात्मक पावले टाकत असून, या सर्व प्रश्नांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

“दगडफेक करून एखाद्या रॅलीमध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे”, अशा जरांगे पाटील यांच्या आरोपावरही विखे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. आंदोलनाच्या नावाखाली काही चुकीचा प्रकार घडवून जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करण्याचा सरकारचा कोणताही उद्देश नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी लढा देणारे आणि समाजासाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचे काम शंभर टक्के शासनाचे आहे”, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. “जरांगे पाटील यांनी मागितलेला नोंदणीचा डाटा सरकारने पूर्ण दिला असून, संपूर्ण राज्याचा डाटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित आयुक्तांना त्यांना आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत”, अशी माहितीही विखे पाटील यांनी दिली.

चक्काजाम का करताय?; नाशिक-पुणे रेल्वेवरही विखेंचा सवाल

नाशिक-पुणे रेल्वेसाठी चक्काजाम आंदोलनाच्या भूमिकेवरही विखे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. नाशिक-पुणे रेल्वे झाली पाहिजे, ही सर्वांचीच मागणी आहे. मी स्वतः रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी देवेंद्र फडणवीस यांनीही पुढाकार घेतला आहे,असे त्यांनी सांगितले. रेल्वे प्रकल्प पुढे नेण्यासाठी तज्ज्ञांकडून अभ्यास सुरू असताना चक्काजाम आंदोलनाची गरज काय? असा सवाल विखे पाटील यांनी केला.

उपवर्गीकरण अन् ५० टक्क्यांचा पेच; सरकार तोडगा काढणार

उपवर्गीकरणातून आरक्षण देण्यास जरांगे पाटील यांचा विरोध आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे का नेली जात नाही? असा त्यांचा सवाल आहे. यावर बोलताना विखे पाटील यांनी या दोन्ही मुद्द्यांमध्ये कायदेशीर गुंतागुंत असल्याचे मान्य केले. मात्र, या सर्व बाबींमधून सरकार मार्ग काढत आहे. कायदेशीर बाबींवर कायदेशीर मार्गानेच निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे विखे पाटील यांनी सांगितले.

16 टक्के आरक्षणाचा मुद्दा; महाविकास आघाडीवर विखेंचा निशाणा

मागील काळात सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवून ठेवले होते, असा दावा विखे पाटील यांनी केला. मात्र, हे आरक्षण घालविण्यामागे महाविकास आघाडीचे मुख्य सूत्रधार होते, असा थेट आरोपही त्यांनी केला.

आरक्षणाच्या प्रश्नासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीची सरकारला मोठी मदत होत आहे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना सुरू करण्यात आल्या असून, क्रिमिलियरची मर्यादा वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ देण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही सुरू असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा