Headlines

बलराज संघई यांचा कॉलम:स्वतःशी, समाजाशी आणि राष्ट्राशी प्रामाणिक राहणे हीच खरी देशसेवा




१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. आजही २०२६ मध्ये देश स्वतंत्रच आहे. पुढील वर्षांपर्यंत देश स्वतंत्र होऊन ८० वर्षे होतील. स्वतःच्या डोळ्यांनी देशाला मिळालेले स्वातंत्र्य पाहिलेले खूपच कमी व्यक्ती आज देशामध्ये आहेत. आणि ते किती व्यक्त होऊ शकतात ही देखील शंका आहे कारण वयोमानानुसार इंद्रिय क्षमता कमजोर होतात. राज तंत्रामध्ये असलेला भारत, अनेक ठिकाणी संस्थानिकांचे राज्य असलेला भारत देश, स्वतंत्र झाल्यावरही नंतर काही वर्षे ही अनेक समस्यांना झुंज देत पुढे आला. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक स्वातंत्र्य मिळत जायला खूप वर्षे लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे प्रमुख पद भूषवून खूप मोठ्या कष्टाने भारताची घटना, कायदा निर्माण केला. त्याच घटना व कायद्याच्या आधारे आपण संविधानाचा आदर करत अत्यंत प्रतिष्ठेचे जीवन जगत आहोत. स्वातंत्र्य मिळाले त्या काळामध्ये देशामध्ये शिक्षण, दळणवळण, तंत्रज्ञान इत्यादी अनेक बाबतीमध्ये फार मोठे मागासलेपण होते. इतकेच पहा ना आपल्या देशामध्ये अनेक सुविधा किंवा कामाच्या गोष्टी इंग्रजांनी चालू केल्या अर्थात त्या त्यांच्या व्यवहाराच्या सुरळीकतेसाठी. मात्र असंख्य देशभक्तांच्या प्राणाच्या आहुतीच्या बदल्यात मिळालेले स्वातंत्र्य आपण पुढे काही काळ थोडे मंद गतीने विकासाकडे नेले आणि १९७० च्या दशकानंतर देशाच्या परिस्थितीमध्ये मोठे बदल व्हायला सुरुवात झाली. शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान सर्वच बाबतीमध्ये देशाने अत्यंत गतीने प्रगती करायला सुरुवात केली. त्यापूर्वी देशामध्ये मूलभूत समस्याही खूप होत्या त्यामुळे फार मोठा बदल घडू शकला नव्हता. आज या ठिकाणी हे सांगायला फार मोठा अभिमान वाटतो की अनेक क्षेत्रांमध्ये आज आपला देश जगामध्ये आघाडीवर आहे. जगामध्ये मोठ्या शक्तीच्या स्वरूपामध्ये आपला भारत देश उभा होत आहे. इतकेच नव्हे तर स्वतःला मोठे म्हणून घेणाऱ्या जगातील बलाढ्य देशांमध्ये जो काही विकास होतो विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय विकास यामध्ये फार मोठा हातभार भारतीय वैज्ञानिकांचा आहे. आपल्या देशातील महत्त्वाची तरुण संशोधक बौद्धिक पिढी ची ओढ काही मोठ्या राष्ट्रांकडे आहे त्यामुळे ते उपजीविकेसाठी बाहेर देशात जाऊन करिअर करतात. परंतु त्याचा उपयोग त्या देशांना होतो. तंत्रज्ञानामध्ये भारताला स्वतःच्या पायावर संपूर्ण जगामध्ये उभे करायचे असेल तर सर्व तंत्रज्ञान आपण आपल्या देशात विकसित केले पाहिजे. तांत्रिक बाबतीत आपले राष्ट्र इतर देशावर अवलंबून नसावे. म्हणून आपली युवा पिढीची बौद्धिक क्षमता इथेच उपयोगी यावी म्हणूनच माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी मेक इन इंडिया ची उद्घोषणा करत अनेक प्रकारे नवीन पिढीला मदतीचा हात दिला. आज स्टार्टअप प्रोजेक्ट मधून अनेक युवा शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित करत आहेत अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आज आपला भारत देश तंत्रज्ञान, विज्ञान, शिक्षण, अध्यात्म अशा अनेक विषयांमध्ये विकसित आहे. परंतु आज पुन्हा एक आवश्यकता आहे प्रत्येकाने नैतिकतेने स्वतःचे जीवन जगत, हृदयामध्ये देशप्रेम बाळगून देशाच्या विकासाला आणि प्रगतीला स्वतःच्या शक्तीनिशी हातभार लावणे. प्रत्येकाने दररोजचे आपले ध्येय, काम, कर्तव्य बजावत असताना एकच गोष्ट सतत लक्षात ठेवावी की माझ्या या कृतीचा देशासाठी उपयोग आहे का? मी हे केल्यामुळे देशाचे हित आणि नाव उज्वल होणार आहे का? आपण व्यावसायिक असो तर व्यवसायात प्रामाणिकता, आपण संशोधक असो तर केलेले संशोधन आधी देशहिताचे असावे हा विचार महत्त्वाचा आहे. अर्थातच आपण केलेल्या प्रत्येक कृतीचा राष्ट्रासाठी उपयोग हवा. कोणत्याही क्षुल्लक कृतीतून सुद्धा कदापी राष्ट्राचे अहित होऊ नये यासाठी प्रत्येकाने सतत सतर्क राहणे गरजेचे वाटते. एक भारतीय नागरिकाच्या अशा ठाम निश्चयपूर्वक विचारानेच देश जागतिक महासत्ता नक्कीच होईल. देशसेवा म्हणजे काय? हा प्रश्न आज आपल्या मनाला विचारून पाहिला तर त्याचं काय उत्तर येईल? अर्थातच नैतिकता, प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा. प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकतेने सर्व शक्तीनिशी करत राष्ट्रनिष्ठा सतत हृदयात बाळगली तर वेगळी अशी देशसेवा करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. यातूनच राष्ट्रहित उज्वल होईल. आपण स्वतःशी समाजाशी आणि राष्ट्राशी प्रामाणिक असणे हीच खरी देशसेवा. असे माझे मत आहे. जय हिंद ! जय भारत !! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत