Headlines

छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध ‘हॉटेल अमरप्रीत’चा परवाना निलंबित; एफडीएची धडक कारवाई


छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध हॉटलेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये एफडीएने छापा टाकला. यावेळी अनेक धक्कादायक गोष्टी एफडीए अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या.

tukaram mundhe
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवर असलेले अतिशय प्रसिद्ध आणि नामांकित ‘मे. हॉटेल अमरप्रीत’ येथे जेवणासाठी जाणाऱ्या खवय्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने या हॉटेलवर धडक छापा मारला. या तपासणीदरम्यान सडलेल्या भाज्या, मुदतबाह्य अन्नपदार्थ आणि ग्राहकांची उघडपणे होणारी फसवणूक समोर आल्याने प्रशासनाने हॉटेल अमरप्रीतचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.

बटरच्या नावाने ‘ट्रान्स फॅट’युक्त मार्गारीनचा वापर केल्याचा संशय

हॉटेल अमरप्रीतमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी अत्यंत घातक खेळ सुरू असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. हॉटेलच्या मेनू कार्डवर ‘बटर’ (लोणी) नमूद करून ‘बटर चिकन’, ‘बटर तंदुरी रोटी’ आणि विविध ग्रेव्हीमध्ये अस्सल बटरऐवजी विनालेबल असलेल्या ‘मार्गारीन’चा सर्रास वापर केला जात असल्याचा दाट संशय आहे.

मार्गारीन काय आहे?

मार्गारीनमध्ये अतिशय घातक मानले जाणारे ‘ट्रान्स फॅट’ असते, ज्यामुळे मानवी शरीरात थेट हृदयविकाराचा धोका प्रचंड वाढतो. ही ग्राहकांची उघड फसवणूक आणि दिशाभूल करणारी बाब मानली गेली आहे. सडलेल्या भाज्या, खराब मशरूम अन् मुदतबाह्य ‘पिझ्झा बेस’ एफडीएच्या पथकाने हॉटेलच्या चिलिंग सेंटर आणि स्टोअर रूमची पाहणी केली असता तिथे अत्यंत भयानक दृश्य आढळले.

काकडी, ढोबळी मिरची, फुलकोबी, पत्ताकोबी यांसारख्या सडलेल्या आणि कुजलेल्या भाज्यांचा साठा आढळून आला. अत्यंत खराब झालेले आणि मुदतबाह्य झालेले मशरूम साठवून ठेवले होते. ग्राहकांसाठी पिझ्झा बनवण्यासाठी वापरला जाणारा ‘पिझ्झा बेस’ देखील पूर्णपणे मुदतबाह्य झालेला होता.

स्वयंपाकघरात सांडपाणी साचलेले; ‘FIFO’ नियमाची पायमल्ली

हॉटेलच्या स्वयंपाकघरात कमालीची अस्वच्छता आढळून आली. किचनमध्ये सांडपाणी साचलेले होते आणि कचराकुंड्या उघड्या ठेवण्यात आल्या होत्या. अन्न साठवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ या सुरक्षित प्रणालीचा कुठेही वापर केला जात नव्हता. सार्वजनिक आरोग्यास निर्माण झालेला हा गंभीर धोका पाहता, अन्न व औषध प्रशासनाने कडक पाऊल उचलत हॉटेल अमरप्रीतला कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री किंवा ग्राहकांना सर्व्हिस देणे तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

फौजदारी कारवाईचा इशारा

निलंबन कालावधीत जर हॉटेलने व्यवसाय सुरू ठेवल्यास ‘अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६’ अंतर्गत कडक कायदेशीर आणि फौजदारी कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. शहर आणि परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या अमरप्रीतसारख्या बड्या हॉटेलवर ही धडक कारवाई झाल्याने हॉटेल व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा