Virat Kohli Debut : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १८ ऑगस्ट या तारखेला विशेष महत्त्व आहे. कारण याच दिवशी १९ वर्षांच्या विराट कोहलीने टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. श्रीलंकेविरुद्ध दांबुला येथे झालेल्या वनडे सामन्यात विराटला फलंदाजीत फार काही करता आले नाही. अवघ्या १२ धावा केल्या. मात्र त्यावेळी कदाचित कोणालाही कल्पना नसेल की हा १९ वर्षांचा तरुण पुढील काही वर्षांत भारतीय क्रिकेटचा किंग बनणार होता. विराटने आपल्या करियरमध्ये सर्वात जास्त प्राधान्य हे कोणत्या गोष्टीला दिले असेल तर ते म्हणजे सातत्य आणि शिस्त. या दोन गोष्टींमुळे आजही ३७ वर्षांचा विराट उत्साही आणि चपळ चित्त्यासारखा मैदानात वावरताना दिसतो. पण ही १८ वर्षांची कारकीर्द सोपी नव्हती, १२ धावांनी सुरू केलेला प्रवास आता २८ हजारांपेक्षा अधिक धावांपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीच्या किंगचा लहानपणापासूनचा प्रवास जाणून घ्या.

विराट कोहलीचे क्रिकेटच्या मैदानातील पहिले पाऊल
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये दिल्लीमधील उत्तम नगर येथे झाला. वडील प्रेम कोहली हे पेशाने वकील आणि आई सरोज कोहली गृहिणी होत्या. विराटला लहानपणापासूच क्रिकेटची आवड होती. विराटच्या वडिलांनी ९ व्या वर्षी त्याला वेस्ट दिल्ली क्रिकेट अकॅडमी लावली. विशाल भारती या शाळेमध्ये त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. कोच राजकुमार शर्मा यांच्या अंडर त्याने ट्रेनिंग सुरू केले. २००१ मध्ये दिल्लीच्या अंडर-१४ टीममध्ये प्रवेश मिळाला नाही. पण पुढच्याच वर्षी दिल्ली अंडर-१५ मध्ये त्याची निवड झाली.
वडिलांच्या निधनानंतरही मैदानात उतरला विराट
२००२-०३ मध्ये पॉली उमरीगर ट्रॉफीत दिल्लीच्या अंडर-१५ संघाकडून खेळताना विराटने दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत त्याने दिल्लीकडून सर्वाधिक १७२ धावा केल्या. त्यानंतर २००३-०४ च्या हंगामात त्याच्याकडे दिल्ली अंडर-१५ संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. या हंगामात त्याने ३९० धावा करत दोन शतके झळकावली. त्यानंतर पुन्हा याच टूर्नामेंटमध्ये ७ सामन्यात ७५७ धावा केल्या. याच वर्षी दिल्लीने ट्रॉफी जिंकली होती. या कामगिरीनंतर २००६ मध्ये भारत अंडर-१९ संघात त्याची निवड झाली. इंग्लंडविरूद्ध कोहलीने चमकदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधले होते. १८ वर्षांचा असताना विराटने २३ नोव्हेंबर २००६ मध्ये त्याने फस्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, मात्र पहिल्या सामन्यात विराट १० धावा करून आऊट झाला होता. २००६ मध्येच १९ डिसेंबरला विराटचे वडिल प्रेम कोहली यांचे निधन झाले.वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यावरही तो मैदानात उतरला आणि कर्नाटकविरूद्ध त्याने ९० धावांची खेळी होती. त्याच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉइंट ठरला होता. या खेळीनंतर घरी येत त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात केले होते.
विश्वचषक विजयाने मिळाली टीम इंडियाची दारं
३ एप्रिल २००७ रोजी विराटने दिल्लीकडून इंटर-स्टेट ट्वेंटी-२० चॅम्पियनशिपमध्ये T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या स्पर्धेत त्याने १७९ धावा करत दिल्लीकडून सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर त्याच्याकडे भारताच्या अंडर-१९ वर्ल्डकप संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. २००८ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मलेशियात झालेला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकला. या कामगिरीनंतर विराटला भारतीय क्रिकेटमधील भविष्यातील स्टार म्हणून पाहिले जाऊ लागले. त्याच वर्षी त्याला वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळाले आणि १८ ऑगस्ट २००८ रोजी दांबुला येथे श्रीलंकेविरुद्ध त्याने वनडेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
वर्ल्डकपमधील पहिले शतक
पदार्पणानंतर विराटला संघातील स्थान पक्के करण्यासाठी काही काळ संघर्ष करावा लागला. मात्र त्याची मेहनत, फिटनेस आणि धावांची भूक यामुळे तो लवकरच भारतीय संघातील महत्त्वाचा फलंदाज बनला. २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे त्याने पहिले वनडे शतक झळकावले आणि आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली. २०११चा वर्ल्ड कप त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. भारताने तब्बल २८ वर्षांनंतर विजेतेपद जिंकले होते आणि या विजयी संघाचा विराट भाग होता. वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावत आपली छाप सोडली. बांगलादेशविरूद्ध कोहलीने नाबाद १०० धावा केल्या होत्या. विराटने तिथूनत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. वर्ल्ड कप जिंकल्यावर क्रिकेटच्या देवाला म्हणजेच सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर उचलणारा कोहलीसुद्धा आज त्याच्याच पावलावर चालत क्रिकेटच्या शिखरावर पोहोचला आहे.
‘चेस मास्टर’ म्हणून विराटची ओळख
धावांचा पाठलाग करताना आक्रमक फलंदाजी, परिस्थितीनुसार खेळाची दिशा बदलण्याची क्षमता आणि शेवटपर्यंत सामना जिंकण्याची जिद्द यामुळे विराट कोहलीला ‘चेस मास्टर’ म्हणून ओळख मिळाली. विशेषतः वनडे क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. शतके, हजारो धावा आणि दबावाच्या परिस्थितीत संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता यामुळे तो मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बनला.
कर्णधार म्हणून विराटचा दबदबा
महेंद्रसिंह धोनीनंतर विराट कोहलीकडे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. कर्णधार म्हणून विराटचा काळ भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ अधिक आक्रमक, तंदुरुस्त आणि लढाऊ बनला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात अनेक संस्मरणीय विजय मिळवले. ऑस्ट्रेलियात २०१८-१९ मध्ये भारताने जिंकलेली कसोटी मालिका ही त्याच्या कर्णधारपदातील सर्वात मोठ्या उपलब्धींपैकी एक मानली जाते. भारताला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर नेण्यातही विराटचा मोठा वाटा होता.
धावांपासून सुरू झालेला विराटचा विराट प्रवास
विराटच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा म्हणजे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांची शंभरी पार करण्याच्या दिशेने केलेली वाटचाल. सचिन तेंडुलकरनंतर भारतीय क्रिकेटमध्ये शतकांच्या विक्रमांबाबत सर्वाधिक चर्चा विराटच्या नावाभोवती राहिली. त्याच्या फलंदाजीतील सातत्य आणि मोठ्या सामन्यांमध्ये कामगिरी करण्याची क्षमता यामुळे त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. १८ ऑगस्ट २००८ वेळी विराटसोबत भारतीय संघात असलेले अनेक खेळाडू आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. काही खेळाडू प्रशिक्षक, समालोचक किंवा क्रिकेटशी संबंधित इतर भूमिकांमध्ये दिसतात. मात्र त्या दिवशी १२ धावा करणारा १९ वर्षांचा विराट आज भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू बनला आहे. दांबुलातील त्या पहिल्या सामन्यातील १२ धावा कदाचित विराटच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी नव्हती. पण त्या १२ धावांनी एका अशा प्रवासाची सुरुवात केली, ज्याने भारतीय क्रिकेटला अनेक संस्मरणीय क्षण दिले.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने कसोटीत ९,२३० धावा आणि ३० शतके, वनडेत १४,९४१ धावा आणि ५४ शतके, तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४,१८८ धावा आणि १ शतक झळकावले आहे. अशाप्रकारे त्याच्या नावावर एकूण २८,३५९ आंतरराष्ट्रीय धावा आणि ८५ शतके आहेत. मोठ्या सामन्यांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो आधुनिक क्रिकेटमधील महान फलंदाज ठरला आहे.

