‘द स्वच्छंद’, ‘साद हिमालयाची’, ‘कॅम्प फायर’ वगैरे ललित गद्य तसेच ‘लॉक ग्रिफिन’, ‘विश्वस्त’ या उत्कंठावर्धक आणि थरारक रहस्यकथा लिहिणाऱ्या वसंत वसंत लिमये यांच्या ‘टार्गेट असद शाह’ या तिसऱ्या कादंबरीचा रेवती वसंत लिमये यांनी केलेला इंग्रजी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने, हेरगिरी, गुप्त पोलिस, थंड डोक्याने केलेल्या विरोधकांच्या हत्या, या आणि अशा गोष्टींचा वापर करून कथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांचा बाप म्हणजे सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रेड्रिक फोर्सिथ. त्यांची पहिली गाजलेली कादंबरी म्हणजे ‘ द डे ऑफ द जॅकल ’. त्यावरूनच या कादंबरीचा विषय सुचला, याबद्दल लिमये यांनी फोर्सिथ यांचे ऋण मान्य केले आहे. असे असले तरी ‘टार्गेट असद शाह’चे कथानक आणि त्याची मांडणी पूर्णपणे देशी आहे. यात तांत्रिक स्वरूपाचा आणि लोकांच्या सामान्यज्ञानात भर घालणारा; काही बाबतीत अनावश्यक वाटणारा पण रंजक तपशील तर आहे. शिवाय भारतीय वाचकांना भावणाऱ्या विविध पात्रांमधल्या नातेसंबंधांवर विशेष लक्ष पुरवलेले आहे.
ही रहस्यकथा असल्यामुळे कथानकाविषयी फार काही सांगता येणार नाही. पाकिस्तान आणि चीन यांचा भारताच्या विरोधातला एक फार मोठा आंतरराष्ट्रीय कट आणि त्याची आपल्या हुशार, कर्तव्यदक्ष आणि स्वतःच्या रागलोभांपेक्षा देशहिताला प्राधान्य देणाऱ्या लोकांनी केलेली उकल, या एका वाक्यात या कादंबरीचा सारांश सांगता येईल. सामान्य नागरिकाला आपल्याभोवती काय चालले आहे याची फारशी काही माहिती नसते. या कादंबरीत वाचकाला डोके खाजवायला लावणारी कोडी आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बॉट्सपासून ते विविध प्रकारच्या उंची वाइन्सपर्यंत विविध विषयांवर खच्चून भरलेली माहिती आहे. विविध सरकारी खाती, संरक्षण संस्था, त्यांमधले सहकार्य किंवा त्याचा अभाव, तर कधी थेट विसंवाद यांचे चित्रण आहे.
ले. कर्नल पिनाकिन नारायण गद्रे उर्फ गंबो, हे या कादंबरीतले एक मुख्य पात्र. दाणीनगर बॉम्ब ब्लास्ट केस आणि ‘ आधुनिक भारत ’ संस्थेशी संबंध असल्याच्या बनावट आरोपांवरून या प्रामाणिक अधिकार्याला तुरुंगात धाडले जाते. तिथे त्याची नऊ वर्षे वाया जातात. पण तुरुंगातून सुटल्यावर जेव्हा त्याला भारताविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय कटाविरोधात काम करण्यासाठी बोलावणे येते, तेव्हा स्वतःवर झालेला अन्याय आणि अपमान विसरून तो त्यासाठी सर्वस्व झोकून द्यायला तयार होतो. त्याच्या कामात पत्नी अस्मिता हिची त्याला साथ मिळते.
संगणकतज्ज्ञ कबीर राजाध्यक्ष आणि त्याची मैत्रीण-जोडीदार शायना हे ‘सिव्हिलियन’ही ‘कवच कुंडल’ या मोहिमेत सामील होतात. कबीर हा समाजवादी, पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते नानासाहेब राजाध्यक्ष यांचा मुलगा. नानासहेबांच्या पुरोगामी, विज्ञानाधिष्ठित विचारसरणी आणि प्रसार कार्याला विरोध करणारऱ्या शक्तींकडून त्यांचा भर दिवसा, रस्त्यावर खून होतो. कबीरची मैत्रीण शायना ही भारतीय आईवडलांची म्हणून आणि विचाराने भारतीय, पण जन्माने आणि पासपोर्टमुळे ब्रिटिश असते. वैद्यकीय शिक्षण घेऊनसुद्धा तिने अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरवलेले असते. पण वेळ येते तेव्हा तीही देशकार्यात मनोभावे सामील होते.
या कादंबरीला गेल्या दोन दशकांमधल्या राजकारणाची पार्श्वभूमी आहे. विश्वस्त या कादंबरीमधले पंतप्रधान वासुदेव घांची, म्हणजेच वाघा हे याही कथानकात वाचकांना भेटतात. त्यांचा राष्ट्रीय जनता पार्टी म्हणजे आरजेपी हा पक्ष, बीएसएस ही संघटना, स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर एक चळवळ म्हणून स्थापन झालेला आणि १९४७ साली राजकीय पक्षात रूपांतर झालेला इंडियन डेमोक्रॅटिक पार्टी (आयडीपी) हा पक्ष, या सर्व गोष्टी वाचकांच्या चांगल्याच परिचयाच्या आहेत. महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणातील अनेक पात्रे कादंबरीत नाव बदलून आलेली असली तरी मराठी वाचकांना त्यांची ओळख सहज पटू शकेल. मूळ मराठी कादंबरी इतकाच अनुवादही उत्कंठावर्धक वाटतो, हे या पुस्तकाचे यश आहे.
……………………………………………………
टार्गेट असद शाह
लेखक : वसंत वसंत लिमये
अनुवाद : रेवती वसंत लिमये
प्रकाशक : वसंत वसंत लिमये
पाने : ४५८, किंमत : ४९९ रु. किंडल : ३४९ रु.

