त. भा. प्रतिनिधी पुणे
राज्यात तसेच देशाच्या बहुतांश भागात 16 जुलैपर्यंत दमदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात मान्सून सक्रिय असल्याने शनिवारी मुंबईसह आठ जिल्ह्यांत अतीवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता वाढणार आहे. गुजरात तसेच कर्नाटक किनारपट्टी दरम्यान हवेचा दाब पुढील काही दिवस कायम राहणार आहे. याशिवाय पूर्व तसेच पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव देशात वाढणार असून,यामुळे मान्सून सक्रिय राहणार आहे. परिणामी पूर्वोत्तर भारत वगळता 8 जुलैपर्यंत देशभर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दमदार पाऊस 9 जुलैपर्यंत कायम राहील.
जुलैच्या 9 ते 16 जुलैच्या आठवड्यात मोसमी वारे पूर्ण देश व्यापणार आहेत. पूर्वी वारे याकाळात सशक्त राहणार असून, यामुळे वायव्य, मध्य भारतात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे,तर दक्षिण, पूर्वोत्तर भारतात पावसाचे प्रमाण कमी राहील. यादरम्यान, मध्य भारतावर या दरम्यान हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे.
राज्यभर पाऊस
राज्यात पुढील दोन आठवडे दमदार पावसाची चिन्हे आहेत. यात 9 जुलैपर्यंत पावसाची तीव्रता अधिक असेल. त्यानंतरच्या 16 जुलैपर्यंत आठवड्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात पाऊस कमी असेल. कोकण गोवा, घाटमाथा तसेच विदर्भात सरासरीइतक्या पावसाची शक्यता आहे.
मान्सून पुढे सरकला
शनिवारी मोसमी वारे राजस्थान, गुजरात, पंजाब तसेच हरियाणाच्या काही भागात पुढे सरकले.
राज्यात पावसाची संततधार
राज्यात पावसाची संततधार कायम असून, शुक्रवारी सवदूर पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात पावसाची तीव्रता अधिक होती. शनिवारी अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार असून, कोकण पट्टा तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर तसेच विदर्भातील काही भागात ऑरेंज अलर्ट आहे.
या जिल्ह्यांना शनिवारी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे-सातारा घाट, रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, धुळे, नंदुरबार, वाशिम,यवतमाळ, गोंदिया ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
