Headlines

Bjp,वंचित-ठाकरे गटाने युती केल्यास भाजप काय करणार, चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला प्लॅन – bjp chandrashekhar bawankule reaction on possibility of shivsena thackeray camp and vba alliance


Maharashtra Politics | मुंबईत दलित मतदारांचा टक्का मोठा आहे. मुंबईतील अनेक परिसर दलित व्होटबँकेची पॉकेटस मानली जातात. या भागांमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत या भागांमध्ये ठाकरे गटासाठी वंचितची साथ मोलाची ठरू शकते. भाजप, शिंदे गट आणि मनसे एकत्र असल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी वंचित फॅक्टर निर्णायक ठरु शकतो.

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट
  • वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट युती करण्याची दाट शक्यता
BJP VBA Thackeray Camp
ठाकरे गट-वंचित युतीची शक्यता(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉमच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची एकाच मंचावरील उपस्थिती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमानंतर वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होण्याच्या शक्यता कैकपटीने वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून महत्त्वाची टिप्पणी करण्यात आली आहे. कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपला फरक पडत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी चंद्रशेखर बावनुकळे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत भाष्य केले. या दोन्ही पक्षांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना युती करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी यावर बोलणे योग्य ठरणार नाही. पण भाजप आणि शिंदे गटाने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ५१ टक्क्यांची तयारी केली आहे. त्यामुळे कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपला त्याचा फरक पडणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

प्रकाशजी आपल्याला एकत्र यावं लागेल: उद्धव ठाकरे

देशात लोकशाही टिकणार की नाही टिकणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या व्यवस्थांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रकाशजी आपल्याला एकत्र यावं लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मतदारांच्या जीवावर सरकार उभं असतं. मतदारांच्या जनजागृतीचं काम आपल्याला करावे लागेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी रविवारी एका कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांना युतीची साद घातली होती. प्रकाश आंबेडकर यांनीही उद्धव ठाकरेंच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

आम्ही एकत्र कधी येणार हे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. निवडणूक कधी होणार यावर अवलंबून आहे. निवडणूक ताबडतोब होणार असेल तर आम्ही ताबडतोब एकत्र येऊ, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी काळात शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येणार का यासंदर्भात चर्चांना सुरुवात झाली आहे.
Maharashtra Timesएकमेकांचा आदर, अनुकूल मांडणी आणि भविष्यातील राजकारणाचा वेध, ठाकरे-आंबेडकर युती राजकीय समीकरणे बदलणार?

ठाकरे गट- वंचित एकत्र आल्यास राजकीय समीकरणे बदलणार?

आगामी काळात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. २०१९ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काय करू शकते, याची चुणूक प्रकाश आंबेडकर यांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाची युती झाल्यास आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (ठाकरे गट) काहीप्रमाणात फायदा होऊ शकतो. मुंबईत दलित मतदारांचा टक्का मोठा आहे. मुंबईतील अनेक परिसर दलित व्होटबँकेची पॉकेटस मानली जातात. या भागांमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत या भागांमध्ये ठाकरे गटासाठी वंचितची साथ मोलाची ठरू शकते. भाजप, शिंदे गट आणि मनसे एकत्र असल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी वंचित फॅक्टर निर्णायक ठरु शकतो.

रोहित धामणस्कर

लेखकाबद्दलरोहित धामणस्कररोहित धामणस्कर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | लोकसत्ता, झी २४ तास, टीव्ही ९ मराठीसह डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ९ वर्षांचा अनुभव | सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.आणखी वाचा