अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती; हॉटेलमध्येही होणार पाहणी
पिंपरी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आळंदी ते वाल्हे आणि देहू ते इंदापूर या मार्गांवर हॉटेल, अन्नपदार्थ, प्रसाद व अन्नदान संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही मार्गावर मिळून 20 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
आळंदी व देहू येथून या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने भाविक, वारकरी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. मार्गावर दिंडीधारक, भाविकांना अथवा संस्थांकडून वारकरी, विविध ठिकाणी हॉटेल, खानावळी वेगवेगळ्या अन्नदान केले तसेच, प्रसाद दिला जातो.
त्याबाबतची खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच, रस्त्यावर विक्रेते, हातगाडीचालक हे विविध खाद्यपदार्थ विक्रीला ठेवतात. यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका होऊ नये, यासाठी त्याच्याही तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
पालखी मार्गावर बाटलीबंद पाण्याच्या लेबलची पाहणी, तळलेल्या पदार्थाची ‘टीपीसी’ मीटरद्वारे पडताळणी, मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्री थांबवणे, खराब व खाण्यास अयोग्य अन्नपदार्थ नष्ट करण्यासह मिठाई, प्रसाद विक्रेत्यांनी त्यावर ‘यूज बाय डेट’ पाहणी केली जाणार आहे.
माउलींच्या पालखीमार्गावर तपासणी ठिकाणे :
आळंदी परिसर, भवानी पेठ, हडपसर, सासवड (तीन वेगवेगळ्या ठिकाणी), वाल्हे. तुकोबांच्या पालखीमार्गावर तपासणी ठिकाणे – इनामदार वाडा (देहू), विठ्ठल मंदिर (आकुर्डी), निवडुंगा विठ्ठल मंदिर (नाना पेठ, पुणे), नवीन पालखी तळ (कदमकावस्ती, लोणी काळभोर), भैरवनाथ मंदिर (यवत पालखी तळ), श्री विठ्ठल मंदिर (वरंवड), उडवंडी (बारामती), शारदा विद्यालय (बारामती), सणसर (बारामती), निमगांव केतकी (इंदापूर), पालखी तळ (इंदापूर), सराटी (इंदापूर).
