Headlines

Sanjay raut gives strong response to political discussions triggered by jayant patil eknath shinde meeting; पाटील, आव्हाड अचानक एकनाथ शिंदेंना भेटले, राजकीय बदलाच्या चर्चांना उधाण; संजय राऊतांनी खास शैलीत केलं भाष्य


नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नागपुरात मिश्किल भाष्य केलं आहे. मागील तीन दिवसांत जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले असताना, केवळ भेटीगाठींवरून पक्षांतराचे निष्कर्ष काढणे चुकीचं असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. उद्या ते रामदास आठवलेंना भेटले तर त्यांच्या पक्षात जाणार का? असा सवालही राऊत यांनी केला आहे.

नागपूर इथं बोलताना संजय राऊत म्हणाले की, “उद्या जर जयंत पाटील हे रामदास आठवले यांना भेटायला गेले, तर ते त्यांच्या पक्षामध्ये जाणार आहेत का? महाराष्ट्रात आणि देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. नेते एकमेकांना भेटत असतात. याचा अर्थ ते त्या पक्षात गेले किंवा त्या पक्षातून बाहेर पडले, असा होत नाही. जयंत पाटील असोत किंवा जितेंद्र आव्हाड, हे दोघेही विविध पक्षांच्या नेत्यांशी सातत्याने संवाद साधत असतात. ते फ्री बर्ड आहेत. त्यांना भेटू द्या,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसंच प्रत्येक भेटीचा अर्थ पक्षांतर किंवा राजकीय समीकरणांतील मोठा बदल असा लावणे योग्य नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

ठाकरेंच्या पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण का?

‘हे लग्नाचं आमंत्रण नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ हिंदुत्वाशी संबंधित एक कार्यक्रम आयोजित केला आहे. रामभक्त आणि रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवक म्हणून त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे,’ असं ते म्हणाले. याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “नागपूर ही हिंदुत्वाची राजधानी आहे. हिंदुत्वाशी संबंधित सर्व प्रमुख व्यक्तींना आम्ही आदरपूर्वक निमंत्रण दिले आहे. सरसंघचालकांना येणे शक्य नसेल, तर त्यांनी प्रतिनिधी पाठवावा, अशी विनंती केली आहे. भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांनाही आम्ही निमंत्रित केले आहे,” असे राऊत म्हणाले.

दरम्यान, भाजप नेत्यांनी या निमंत्रणावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर टीका करताना राऊत म्हणाले, कसा काय राजकीय विरोध करू शकतात? ते काय बोलले, हे मला माहीत नाही. मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे असतात. आम्ही सलग २५ वर्षे भारतीय जनता पक्षासोबत काम केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही दीर्घकाळ राजकीय सहकार्य राहिले आहे. अशा कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात काहीच गैर नाही. त्यावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणं हा मूर्खपणा आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.