![]()
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका आणि श्री निवडुंगा विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली. वारीत सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया चरणी घातले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासणे, महापौर मंजुषा नागपूरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहरचे पोलीस सहआयुक्त संजय दराडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे, श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष हिरालाल मालू, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री. तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुणे शहरातील पालखीच्या ठिकाणी असणाऱ्या अडीअडचणी पुणे महानगरपलिकेने योग्य पद्धतीने दूर केल्या आणि सुविधांचा विस्तार केला. पुढच्या वर्षी यामध्ये आणखीन विस्तार करण्यात येईल. वारकऱ्यांनी वारीचा आनंद घेत सुखरूप पंढरपूर येथे पोहचावे, असे आवाहन करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ही वारी अतिशय सुखरुपपणे पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी… अशा भक्तिमय वातावरणात पुणे शहर दुमदुमले आहे. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी पुणे शहरात दाखल झाले आहेत, उद्या सकाळी या पालखीच सोहळ्याचे लोणी काळभोरकडे प्रस्थान होणार आहे. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरम्यान, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने आयोजित ‘श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरण सेवा’ उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन घेऊन व आशीर्वाद घेऊन या सेवाकार्यात सहभागी होत असल्याचा विशेष आनंद आहे. वारीत सहभागी होणारे वारकरी भगिनी-बंधू दीर्घ पायी प्रवास करून येथे पोहोचतात. त्यांचा शारीरिक शीण दूर व्हावा, या उद्देशाने राबविण्यात येणारा ‘चरण सेवा’ उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. वारकरी संप्रदायात प्रत्येकामध्ये माऊलीचे दर्शन घेतले जाते. एकमेकांच्या चरणी नम्रतेने वंदन करण्याची परंपरा ही समतेचा आणि भक्तीचा संदेश देणारी आहे. अशा वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य असून, विठुरायाच्या भक्तांची सेवा हीच विठ्ठलभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात तरुण स्वयंसेवक मोठ्या समर्पित भावनेने वारकऱ्यांची सेवा करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या सेवाकार्यात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते आणि आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले. विशेषतः आमदार सुनील कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले. ग्रामविकास विभागामार्फत आधुनिक पद्धतीच्या चरण सेवा यंत्रांचीदेखील उपलब्धता करून देण्यात आली असून त्याद्वारे वारकऱ्यांना अधिक चांगली सुविधा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत आषाढी वारीच्या व्यवस्थापनात अनेक सकारात्मक बदल करण्यात आल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था, निर्मल वारी अभियान, प्रशस्त पालखी मार्ग अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच येत्या दोन ते तीन वर्षांत पंढरपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून, भविष्यात पंढरपूरचा विकास काशी, अयोध्या आणि उज्जैनप्रमाणे आदर्श धार्मिक क्षेत्र म्हणून करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.
Source link
तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी साकडे
