Maharashtra Politics | मुंबईत दलित मतदारांचा टक्का मोठा आहे. मुंबईतील अनेक परिसर दलित व्होटबँकेची पॉकेटस मानली जातात. या भागांमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत या भागांमध्ये ठाकरे गटासाठी वंचितची साथ मोलाची ठरू शकते. भाजप, शिंदे गट आणि मनसे एकत्र असल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी वंचित फॅक्टर निर्णायक ठरु शकतो.
हायलाइट्स:
- उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट
- वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट युती करण्याची दाट शक्यता

यावेळी चंद्रशेखर बावनुकळे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत भाष्य केले. या दोन्ही पक्षांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना युती करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी यावर बोलणे योग्य ठरणार नाही. पण भाजप आणि शिंदे गटाने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ५१ टक्क्यांची तयारी केली आहे. त्यामुळे कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपला त्याचा फरक पडणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.
प्रकाशजी आपल्याला एकत्र यावं लागेल: उद्धव ठाकरे
देशात लोकशाही टिकणार की नाही टिकणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या व्यवस्थांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रकाशजी आपल्याला एकत्र यावं लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मतदारांच्या जीवावर सरकार उभं असतं. मतदारांच्या जनजागृतीचं काम आपल्याला करावे लागेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी रविवारी एका कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांना युतीची साद घातली होती. प्रकाश आंबेडकर यांनीही उद्धव ठाकरेंच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
आम्ही एकत्र कधी येणार हे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. निवडणूक कधी होणार यावर अवलंबून आहे. निवडणूक ताबडतोब होणार असेल तर आम्ही ताबडतोब एकत्र येऊ, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी काळात शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येणार का यासंदर्भात चर्चांना सुरुवात झाली आहे.
एकमेकांचा आदर, अनुकूल मांडणी आणि भविष्यातील राजकारणाचा वेध, ठाकरे-आंबेडकर युती राजकीय समीकरणे बदलणार?
ठाकरे गट- वंचित एकत्र आल्यास राजकीय समीकरणे बदलणार?
आगामी काळात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. २०१९ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काय करू शकते, याची चुणूक प्रकाश आंबेडकर यांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाची युती झाल्यास आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (ठाकरे गट) काहीप्रमाणात फायदा होऊ शकतो. मुंबईत दलित मतदारांचा टक्का मोठा आहे. मुंबईतील अनेक परिसर दलित व्होटबँकेची पॉकेटस मानली जातात. या भागांमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत या भागांमध्ये ठाकरे गटासाठी वंचितची साथ मोलाची ठरू शकते. भाजप, शिंदे गट आणि मनसे एकत्र असल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी वंचित फॅक्टर निर्णायक ठरु शकतो.

