Thane-Bhiwandi-Kalyan Metro: ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो ५ मुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पण प्रस्तावित मार्गाचा आराखडा तयार करणं अधिकाऱ्यांसाठी एक मोठं आव्हान आहे त्यामुळे कल्याणमधील अनेक कामं रखडली आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ चा मार्ग बदलण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर ‘एमएमआरडीए’कडून ही मेट्रो बिर्ला कॉलेजमार्गे रेल्वे स्टेशनकडून मेट्रो १२ला जोडली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या नव्या मार्गानुसार मेट्रोचा आराखडा अद्याप तयार करण्यात आलेला नाही. मेट्रो हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे जोपर्यंत या प्रकल्पाचा आराखडा निश्चित होत नाही तोपर्यंत या मार्गाला संलग्न असलेले इतर प्रकल्प थांबवावे लागले आहेत. यामुळे कल्याण पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल मेट्रो मार्गात येत असल्याने त्याचे काम थांबवावे लागले आहे. तर कल्याण न्यायालयाच्या नव्या इमारतीचा प्रश्नही लाल फितीत अडकला आहे. यामुळे या मेट्रोमार्गाच्या आराखड्याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
तीन महिन्यांनंतरही आराखडा प्रसिद्ध नाही
राज्यातील मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५च्या माध्यमातून कल्याणमध्ये करण्यात आले. त्यानंतर मुंबईतील अनेक मेट्रोचे उद्घाटन झाले असले तरी ठाणे-कल्याण मेट्रोचे येथील काम सुरू देखील झालेले नाही. या मेट्रोचा कल्याण शहराला फायदा व्हावा, यासाठी हा मेट्रोमार्ग खडकपाडा-बिर्ला कॉलेज-पौर्णिमा मार्गे रेल्वे स्टेशन असा बदलण्याची मागणी ‘एमसीएचआय’ कडून सुरू होती. अखेर या मार्गाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत त्याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. यामुळे कल्याणातून जाणाऱ्या या मेट्रोचा लाभ शहराच्या बहुतांश भागाला होणार आहे. हा अध्यादेश काढून तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापी एमएमआरडीएकडून या मार्गाचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
हा मेट्रोमार्ग पौर्णिमा चौकात काटकोनात वळवावा लागणार आहे. तिथेच मेट्रो ५ अ हा मार्ग सुरू होणार आहे. यामुळे या चौकाचे नियोजन करत मेट्रो रेल्वे स्थानकाच्या दिशेने वळविण्याचे सध्या तरी आव्हान वाटत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे या चौकाच्या पुढच्या बाजूने कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मेट्रोमार्ग निश्चित केल्यानंतर या पुलाचे काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा पूल २०२७पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून या पुलाच्या मार्गातील अडथळे दूर करताना प्रशासन आधीच त्रासलेले असताना पुलाचे मुरबाड रस्त्याला जोडणारे सुरुवातीचेच काम तीन महिन्यांपासून थांबले आहे.
मुरबाड रस्ता हा सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता असून या रस्त्यावर पुलासाठी उभारले जाणारे खांब अर्धवट अवस्थेत आहेत. या खांबांचे काम पूर्ण होईपर्यंत येथील रस्ता वाहतुकीसाठी सुरू करता येणार नाही. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. जोपर्यंत मेट्रोचा आराखडा निश्चित केला जात नाही तोपर्यंत पुलाचे काम करता येणार नसल्याने प्रशासनाकडून एमएमआरडीएकडे आराखड्यासाठी वारंवार विचारणा सुरू आहे.
मेट्रो १२ ही तळोजा-कल्याण मेट्रो कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणली जाणार आहे. मेट्रो ५ याच ठिकाणी मेट्रो १२ बरोबर जोडली जाणार आहे. परिणामी सुभाष चौकातून ही मेट्रो वळविण्यासाठी जास्त जागा लागणार आहे. कल्याण न्यायालयाच्या नव्या इमारतीचे कामही थांबविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. मेट्रोबरोबरच महापालिकेचे ‘एमएमआरडीए’ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. पण आराखडा येईपर्यंत ती पूर्ण करणे अवघड झाले आहे. यामुळेच ‘एमएमआरडीए’ने मेट्रो ५च्या नव्या मार्गिकेचा आराखडा तयार करून इतर प्रकल्पांचा मार्ग मोकळा करावा, असे पत्र महापालिका प्रशासनाने ‘एमएमआरडीए’ला पाठवले आहे.
नगररचना विभागाची मागणी
महापालिकेच्या विभागाने उड्डाणपुलाचे काम नगररचना थांबवावे लागले असून मेट्रो ५च्या नव्या आराखड्यासाठी एमएमआरडीएकडे वारंवार मागणी सुरू असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून आराखडा प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुलाच्या कामाचे नियोजन करणे सोयीचे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा