संतांच्या चरित्रांनी झपाटून जाण्याचा हा काळ होता. माउली ज्ञानोबांचं लौकिक जीवन केवळ एकवीस वर्षांचं. माउली तुकोबांचं बेचाळीस वर्षांचं.

या शब्दांच्या वारीनं जीव गुंतवून ठेवला. तंद्रीत राहिलो. संत सहवास घडला. भक्तीची वाट धरली. मन भरकटलं नाही या काळात. दृश्यांच्या प्रभावात राहिलो. चिंतनात सतत ओवी असायची. अभंग असायचा. कुठून कुठे संदर्भ लागायचे. नवं दृश्य सामोरं यायचं. अजान वृक्षावरच्या चिमण्या आठवायच्या. इंद्रायणीची आठवण व्याकुळ करायची.
काळजातून वाहणाऱ्या नदीतून उमटणाऱ्या भावलहरींनी मनात असंख्य आंदोलनं निर्माण केली. तू माउलीहून मयाळ एवढं वाचलं तरी मन तुकोबांच्या मागे धावायचं. तुकोबांची विठोबांच्या भेटीसाठी तगमग आणि आपली तुकोबांच्या भेटीसाठी. तुकोबांमध्येच आपल्या देवाची वस्ती आहे असं पुन्हा पुन्हा मनात यायचं.
माउली नामदेवराय ज्ञानेश्वर समाधी प्रसंगाचं भावपूर्ण वर्णन करतात. ‘नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ’ कालवाकालव होते मनात. माहेर हरवण्याची गोष्ट फार जिव्हारी लागते. तुकोबांना मात्र माहेरी जाण्याची तीव्र ओढ होती. त्यांनी मूळ लवकर पाठवण्यासाठी विठू माईला सतत विनवणी केली. प्रसंगी हट्ट धरला. काही वेळा दाटे कंठ लागे डोळींया पाझर अशी अवस्था व्हायची. आणि असा एक क्षण आलाच जेव्हा माउली तुकोबा देवाला पत्र लिहितात. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा |किंवा माझी सांगा काकुळती || वारकरी निरोप घेऊन जातात.
तुकोबांना आस लागून राहते ती तिकडून निरोप येण्याची. माहेरीचा काय येईल निरोप | म्हणून झोप नाही डोळां|| तुकोबांची तगमग वाढते. अंतरीचे संत आणतील गुज| निरोप तो मज सांगतील || घडी घडी मज आठवे माहेर | न पडे विसर क्षणभरी || याच अवस्थेत तुकोबांना अंतकाळाचा अदमास आला. शेवटचं कीर्तन. सर्व मंडळींना त्यांनी प्रार्थना केली. सकळही माझी बोळवण करा| परतुनी घरा जावे तुम्ही|| आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी| सकळा सांगावी विनंती माझी || वाढवेळ झाला उभा पांडुरंग| वैकुंठा श्रीरंग बोलावितो || अंतकाळी विठो आम्हासी पावला | कुडीसहित झाला गुप्त तुका॥ चारशे वर्ष माउली तुकोबांच्या शब्दांचा प्रकाश जीवनाची वाट उजळून काढतो आहे.

