Headlines

Wardha Three Dies By Lighting Heavy Rainfall In Vidarbha Region Rain Alert;विदर्भात तुफान पाऊस, वर्ध्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू, सात जण जखमी; कुटुंबाने आधार गमावला


वर्धा: विदर्भातील वर्धा, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज कोसळून वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले.

वर्धा जिल्ह्यातील हिरापूर (तळणी) येथे शेतात शनिवारी फवारणी करीत असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे आडोशाला उभ्या असलेल्या झाडावर वीज कोसळल्याने वृषभ कोटगले (वय २२) याचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पुलगाव नजीक हिरापूर शेतशिवारात घडली.

हिरापूर (तळणी) येथील वृषभ कोटगले याने शनिवारी स्वप्नील कोडापे, संजय गोळे आणि विष्णू भोयर यांना सोबत घेऊन शेतात फवारणी सुरू केली. दरम्यान, दुपारी दीड वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे स्वप्नील, संजय आणि विष्णू या तिघांनी एका झाडाखाली; तर वृषभ हा जवळच्याच दुसर्‍या झाडाखाली आडोशाला थांबला. यावेळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू असतानाच वृषभ उभा असलेल्या झाडावर वीज कोसळली आणि यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. स्वप्नील कोडापे, संजय गोळे आणि विष्णू भोयर हे जखमी झाले. पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

वृषभ कोटगले हा कुटुंबाचा एकमेव आधार होता. वृषभच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे वृषभच्या खांद्यावर शेती आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्याच्या पश्चात बहीण, आई आणि आजी-आजोबा असा आप्तपरिवार आहे.

मुंबईत पावसाचा कहर

गेल्या काही दिवसांपासून रुसून बसलेल्या पावसाने कृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त साधत मुंबई, महामुंबई परिसरात जोरदार पुनरागमन केले. शुक्रवार रात्रीपासून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पालघर परिसराला पावसाने झोडपून काढले. पुढील किमान तीन दिवस मुंबई व कोकणात पावसाचा धुमाकूळ कायम राहणार आहे.

मुंबईवर शनिवारी मुसळधार पावसाचा जलाभिषेक झाला. परिणामी मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. सांताक्रूझ येथे विक्रमी २४४.७ एवढ्या मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी रात्रीपासूनच पाऊससरींनी मुंबईभोवती फेर धरला. मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय झाले होते. रायगड जिल्ह्यातही पावसाच्या संततधारेमुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत