Chlorine Gas Leak: गोधनी येथील गॅस गळतीला तीन दिवसही उलटले नसताना तीन दिवसांत नागपूरात दुसरी मोठी दुर्घटना घडली .शंकरपुर जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गळती झाल्याने सुरक्षेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी
क्लोरिन गॅसचे परिणाम काही वेळा तात्काळ, तर काही वेळा उशिराने जाणवू शकतात. त्यामुळे प्रशासनाने गावात आरोग्य सर्वेक्षण करावे, प्रत्येक कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करावी आणि बाधितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
क्लोरिन सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे
गोधनीतील जखमा अजून भरलेल्या नसताना शंकरपूरची घटना घडल्याने क्लोरिन सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. आता प्रशासनाने केवळ गळती थांबविण्यावर न थांबता सर्व जलशुद्धीकरणकेंद्रांची सुरक्षा तपासणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मोठी दुर्घटना टळली
गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून क्लोरिन गॅसगळती होऊन तीन दिवसही उलटत नाहीत तोच गुरुवारी शंकरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातही अशीच घटना घडली. प्रशासनाने तातडीने हालचाली करीत गळतीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, सलग घडलेल्या या घटनांमुळे जलशुद्धीकरण केंद्रांमधील सुरक्षा व्यवस्था, सिलिंडर हाताळणी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातून सोमवारी क्लोरिन गॅसची गळती
गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोमवारीक्लोरिन गॅसची गळती झाली होती. या घटनेत अनेक नागरिक बाधित झाले. काहींवर अद्याप उपचार सुरू असून काही जण अतिदक्षता विभागात असल्याची माहिती आहे. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही, त्यांनाही खोकला, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास, छातीत जळजळ अशा तक्रारी जाणवत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
घटनेची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञ समिती
गोधनीतील घटनेची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयात सादर केला आहे. मात्र, अहवालातील निष्कर्ष अद्याप जाहीर झालेले नाहीत. तोवरच शंकरपूर येथे क्लोरिन गळतीची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाच्या दाव्यांकडे नागरिकांचे सावधपणे लक्ष
जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना आहेत का, सिलिंडरांची नियमित तपासणी होते का, आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशिक्षित यंत्रणा उपलब्ध आहे का, असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने मात्र शंकरपूर येथील घटना गंभीर स्वरूपाची नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. तरीही गोधनीतील अनुभव ताजा असताना दुसऱ्या केंद्रात गळती झाल्याने प्रशासनाच्या दाव्यांकडे नागरिक सावधपणे पाहत आहेत.
अग्निशमन केंद्राची चमू तातडीने घटनास्थळी दाखल
गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बेसा अग्निशमन विभागाला शंकरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून क्लोरिन गॅस गळती होत असल्याचा कॉल प्राप्त झाला. गोधनीतील घटना नुकतीच घडल्याने प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागालाही माहिती देण्यात आली. नरेंद्रनगर अग्निशमन केंद्राची चमू तातडीने घटनास्थळी पोहोचली.
गळती पूर्णपणे थांबविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू
गळती होत असलेले सिलिंडर जलशुद्धीकरण केंद्रातील अधिकारी-कर्मचारी, तज्ज्ञ आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षितरीत्या बाजूला करण्यात आले. जेसीबीच्या मदतीने हे सिलिंडर खुल्या जागेत लटकवून ठेवण्यात आले. गळती वाढू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे अग्निशमन विभागातील सूत्रांनी सांगितले. ओसीडब्ल्यू आणि पेसोच्या तज्ज्ञ चमूला घटनास्थळी बोलावण्यात आले. कॉस्टिक सोडा आणि बर्फाच्या मदतीने गळती पूर्णपणे थांबविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

