अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती नेमण्यात आ
.
आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती
आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. यामध्ये एम्सचे (AIIMS) प्रतिनिधी, डीएमईआरचे (DMER) तज्ज्ञ, महावितरणचे (MSEDCL) मुख्य विद्युत अभियंता (इलेक्ट्रिकल चीफ इंजिनियर) आणि फायर सेफ्टी तज्ज्ञांचा समावेश असेल. ही समिती संपूर्ण तांत्रिक बाबी, मशिनरी आणि यंत्रणेतील त्रुटींची तपासणी करून ८ दिवसांत शासनाला सविस्तर अहवाल सादर करेल. अहवालात ज्यांच्यावर ठपका ठेवला जाईल किंवा ज्यांचा निष्काळजीपणा समोर येईल, त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई केली जाईल.
व्हेंटिलेटर, फायर सेफ्टी आणि उपकरणांची होणार तपासणी
संबंधित व्हेंटिलेटर वॉरंटी काळात होते आणि 6 तारखेलाच कंपनीकडून त्याचे इन्स्पेक्शन झाले होते, तरीही ही दुर्घटना कशी घडली? याची तांत्रिक तपासणी केली जाईल. आगीच्या वेळी सायरन वाजले होते का, स्प्रिंकलर्स आणि फायर फॉग सिस्टिम कार्यान्वित होती का, याचीही पडताळणी केली जात आहे. उपकरण पुरवणाऱ्या कंपन्या किंवा कंत्राटदारांची प्रक्रिया नियमांनुसार झाली होती का, हे तपासले जाईल. निकृष्ट दर्जाची उपकरणे देणाऱ्या आणि हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल.
राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट
अमरावती आणि यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांच्या फायर ऑडिट नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी उद्या मंत्रालयात तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. निधीअभावी फायर ऑडिट किंवा नूतनीकरण थांबले असल्यास संबंधित प्रशासनाने त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे होते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत रुग्णांची सुरक्षा हीच सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य सेवेतील सुधारणा आणि पदभरती
मेळघाट आणि राज्यातील दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी 1400 डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आदिवासी भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना ३ वर्षांनंतर त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना दिली जाईल. कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या 500 डॉक्टरांना सेवेतून कमी करण्यात आले असून, अन्य 500 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यातील ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी 700 ते 800 स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश पुढील आठवड्याभरात जारी केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अमरावतीतील दुर्घटनेनंतर आता सरकारसमोर केवळ दोषी शोधण्याचे आव्हान नाही, तर रुग्णालयातील अग्निसुरक्षा, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय उपकरणांची गुणवत्ता, फायर ऑडिट, निविदा प्रक्रिया आणि प्रशासनातील समन्वय यातील त्रुटी दूर करण्याचेही आव्हान आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले असले तरी, 3 नवजात बालकांच्या मृत्यूमागची नेमकी कारणे काय होती, फायर सेफ्टी यंत्रणा का अपयशी ठरली, व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक बिघाड होता का, फायर ऑडिट वेळेत का झाले नाही आणि प्रशासनाने पूर्वीच्या सूचनांवर कारवाई का केली नाही, या प्रश्नांची उत्तरे चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट होणार आहेत. पुढील 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आता या चौकशीचा निष्कर्ष आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईकडे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
अमरावतीमध्ये रुग्णालयाच्या बाल युनिटमध्ये आग: 3 नवजात बालकांचा मृत्यू, 39 बालके दाखल होती; व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली. त्यानंतर धूर पसरला. त्यावेळी NICU मध्ये 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. आग लागताच कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी, परिचारिकांनी आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि अनेक मुलांना सुरक्षित बाहेर काढले. आग लागण्याचे कारण शोधले जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
3 वर्षांत 44 हजार बालकांचा मृत्यू, थातूरमातूर कारवाई नको: राज्यातील सर्वच रुग्णालयांचे ऑडिट करा; रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

अमरावती येथील रुग्णालयातील आग आणि बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. रुग्णालयांमध्ये आग लागून निष्पाप बालकांचे बळी जाणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून केवळ एका अधिकाऱ्याला निलंबित करून किंवा थातूरमातूर चौकशी करून हा प्रश्न सुटणार नाही, असा घणाघात त्यांनी केला. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णालयाचे तत्काळ फायर व सेफ्टी ऑडिट करावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. येथे वाचा संपूर्ण बातमी
