वृत्तसंस्था
इस्लामाबाद
पाकिस्तानच्या अशांत आणि दुर्गम भौगोलिक प्रदेश असलेल्या बलुचिस्तानमध्ये शुक्रवारी एक प्रवासी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दुर्दैवाने किमान 40 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या सीमेजवळ घडला. या अपघातामुळे संपूर्ण प्रदेशात भीतीचे वातावरण पसरले असून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
रस्ते अपघाताची ही दुर्दैवी घटना बलुचिस्तानमधील शेरानी जिह्यातील धन्सर परिसरात घडली. ही बस बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथून खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माईल खानकडे जात होती. घाटमार्गात वळणदार डोंगराळ रस्त्यांवर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन खोल दरीत कोसळले. प्राथमिक अहवालानुसार, बसमधील प्रवाशांचा आक्रोश ऐकून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु खोल दरीमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
बसमध्ये असलेल्या प्रवाशांच्या संख्येबाबत वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे. शेरानीचे उपायुक्त (डीसी) वली खान काकर यांच्या म्हणण्यानुसार, बस क्वेट्टा येथून 36 प्रवाशांना घेऊन निघाली होती. मात्र, वाटेत दुसरी बस नादुरुस्त झाली आणि त्यातील प्रवाशांनाही बसमध्ये घेण्यात आले. खैबर पख्तुनख्वाच्या रेस्क्यू 1122 सेवेनुसार, बसचा अपघात झाला तेव्हा बसमध्ये एकूण 48 प्रवासी होते. 40 मृतदेह सापडले असून, इतर आठ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच, बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी तात्काळ बचावकार्याला गती देण्याचे आदेश दिले. सध्या, दोन्ही प्रांतांच्या जिल्हा प्रशासनाची पथके, आपत्कालीन सेवा आणि रेस्क्यू 1122 घटनास्थळी तैनात आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.
