अमानवी महत्त्वाकांक्षेच्या सत्तांध माणसांना इतरांच्या दुःखाचा विसर पडतो. समता, बंधुता, न्यायाच्या प्रस्थापनेसाठी झटण्याऐवजी ते भोवतालातल्या करुणेचा गळा दाबण्यात पुढाकार घेतात.

मानवी मन व्यामिश्र, अनाकलनीय असून त्याचा थांग लागत नाही, म्हणून सुरू झाला तो मानवाचा स्वःशोधाचा प्रयोग. त्याच्या तळाशी होता कोऽहम, मी कोण?… हा अनंत काळापासून अनुत्तरित राहिलेला प्रश्न. त्याच्या उत्तरार्ध असंख्य विद्वानांनी तत्त्वज्ञान प्रसवले. मन अन् वर्तन नियमन करणारे न्याय, नीतिशास्त्र, धर्मतत्त्वे आकाराली आली. विचारव्यूह आखण्याचे प्रयत्नही झाले. तरी माणसाचा स्वःशोधाचा प्रवास कधी थांबला नाही.
मानवी कल्पना, संवेदनांचा आविष्कार नेहमी नवे तत्त्वज्ञान, सिद्धांतांना जन्म देणारा असतो. त्याची कालपरत्वे निकड अधिक असते. या अविष्करणावर संस्कार महत्त्वपूर्ण ठरतात. ते संस्कार शिक्षण, धर्मातून घडावेत ही अपेक्षा. ज्ञानोबा-तुकोबा या आमच्या परंपरेने मनावर संस्कार करण्यासाठी देह झिजवला. मात्र आज धर्म आणि शिक्षण या अपेक्षा पूर्ण करतेय का? काळ कोणताही असो, अमर्याद स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अविरत धडपडीत मश्गुल राहून आनंदी असण्याचा सार्वत्रिक भ्रम निर्माण करणे हा मानवी स्वभाव. हा अट्टाहास मूळ आनंदापासून माणसांना दूर घेवून गेला.
तत्त्वतः माणसांना जगण्यास ज्ञानापेक्षा ‘ आनंद ’ अधिक उपयुक्त असतो. त्यासाठी निसर्गतः जगण्याचा ‘अर्थ’ आणि अर्थातील ‘आनंद’ कळायला हवा. अमर्याद इच्छा पूर्तेतेसाठी वाटेल ते करण्याच्या धडपडीत माणसे समाधानाच्या झऱ्यापासून दूर गेली. जगभरातील सत्ताकारणाचा हा चेहरा आनंद हिरावून घेण्यात पुढाकार घेतो. म्हणून बरा-वाईटाचा संघर्ष कालातीत आहे. यासाठीच धर्मग्रंथ निर्मिले गेले. परंतु आज माणसे एकीकडे धर्म व धर्मग्रंथ यांच्या बाबतीत सश्रद्ध दाखवून विपरीत वागण्यात हयात खर्ची घालतात.
सध्या सार्वत्रिक जीवनातील स्खलन टोकदार असून त्याचा व्यक्तिजीवनावरील परिणाम व्यापक आहे. त्यात आता आपल्या हाती काही नाही, असे समजून काळाच्या पाठीवर आपले ओझे बांधून असे म्हणता येईल, समय धीरे-धीरे सब ठीक कर देता है, वक़्त को बस थोड़ा-सा वक़्त चाहिए!
(लेखक छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत.)

